बाळासाहेबाच्या स्मृती स्थळावर जाण्यापासून शिवसैनिक राणेंना रोखणार?; विनायक राऊतांनी दिला ‘हा’ इशारा

| Updated on: Aug 18, 2021 | 6:20 PM

येत्या 19 ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यावेळी राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. (vinayak raut)

बाळासाहेबाच्या स्मृती स्थळावर जाण्यापासून शिवसैनिक राणेंना रोखणार?; विनायक राऊतांनी दिला हा इशारा
vinayak raut
Follow us on

सिंधुदुर्ग: येत्या 19 ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यावेळी राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. मात्र, त्याला शिवसेनेने विरोध केला आहे. स्मृती स्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. (vinayak raut attacks narayan rane’s jan ashirwad rally in mumbai)

विनायक राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाटगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

जिथे राणे, तिथे शिवसेनेचाच विजय

राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.

गणपतीपूर्वीच खड्डे भरणार

चिपळूणमधील वाशिष्ठीच्या नवीन पुलावरून एका लेनची वाहतूक 2 ते 3 सप्टेंबरपर्यत सुरू करण्याबाबत आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवाय, मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे गणपतीपूर्वीच भरले जातील. फक्त पावसानं कृपा केली पाहिजे, असं ते म्हणाले. सध्या मुंबई-गोवा हायवेवर खड्ड्याचं साम्राज्य असून प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय मल्हारी नदीवरील पूल वाहून गेल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या साकवाचे भूमिपूजन करण्यात आले. राऊत यांच्या हस्ते या साकवाचे भूमिपूजन करण्यात आले असून यावेळी आमदार वैभव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. साकव उभारणीचे काम रात्रंदिवस करून गणेशचतुर्थीपूर्वी हा साकव पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (vinayak raut attacks narayan rane’s jan ashirwad rally in mumbai)

 

संबंधित बातम्या:

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार

शरद पवारांची राज्यपालांवर वयावरून बोचरी टीका; राज्यपाल म्हणतात, टीका करायलाच हवी का?

अमित शहा, जेपी नड्डांना भेटल्यानंतरही पंकजा मुंडे नाराज?; रावसाहेब दानवेंनी केलं मोठं विधान!

(vinayak raut attacks narayan rane’s jan ashirwad rally in mumbai)