काँग्रेसची वाट पाहतोय, पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी : नवाब मलिक

| Updated on: Nov 11, 2019 | 12:40 PM

राष्ट्रवादीने आपला निर्णय काँग्रेसच्या निर्णयानंतर जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे (NCP Shiv Sena)  प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काँग्रेसची वाट पाहतोय, पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुन्हा बैठक झाली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे (NCP Shiv Sena) सर्व बडे नेते हजर होते. राष्ट्रवादीने आपला निर्णय काँग्रेसच्या निर्णयानंतर जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे (NCP Shiv Sena)  प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. काॅंग्रेसच्या कमिटीची सुद्धा बैठक झाली आहे. काॅंग्रेसचे नेते पुन्हा 4 वाजता बैठक घेतील, त्यामुळे काॅंग्रेसचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय जाहीर करणार नाही.  पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. शरद पवार मुंबईत आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीत. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं नवाब मलिक म्हणाले.

काँग्रेसची दिल्लीत बैठक

काँग्रेसच्या कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस वरिष्ठांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. त्यानंतर आज पुन्हा दुपारी चार वाजता काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय होईल.

काँग्रेसचे 40 आमदार सेनेला पाठिंबा देण्यास तयार

काँग्रेसचे सर्व आमदार राजस्थानातील जयपूरमध्ये आहेत. काँग्रेसचे तरुण आमदारा सुरुवातीपासूनच शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने होते. आता 44 पैकी तब्बल 40 आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार आहेत. तसं पत्र या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं आहे.