17 मे ते 17 जून दरम्यान तुम्हाला मिळणार नशीब बदलण्याची सुवर्णसंधी, काय करावे आणि काय टाळावे?

अधिक मास २०२६ आज म्हणजेच १७ मे पासून सुरू होत आहे. जाणून घ्या पुरुषोत्तम मासाचे महत्त्व, पूजा विधी, धार्मिक नियम आणि या महिन्यात कोणत्या गोष्टी करणे टाळावे.

17 मे ते 17 जून दरम्यान तुम्हाला मिळणार नशीब बदलण्याची सुवर्णसंधी, काय करावे आणि काय टाळावे?
Adhik Maas 2026
| Updated on: May 17, 2026 | 3:19 PM

हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि फलदायी मानल्या गेलेला अधिक मास आज १७ मे २०२६ पासून सुरुवात होत आहे. हा महिना १५ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार, या महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. हा संपूर्ण काळ भगवान श्री विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित केला जातो. या दिवसात केलेल्या साधना आणि दानाचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

अधिक मास म्हणजे काय?  

हिंदू पंचांगाची रचना सूर्य आणि चंद्राच्या गतीवर आधारित असते. चंद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यामध्ये दरवर्षी सुमारे ११ दिवसांचा फरक असतो. हाच फरक भरून काढण्यासाठी आणि दोन्ही वर्षांमध्ये अचूक संतुलन राखण्यासाठी दर तीन वर्षांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. धार्मिक मान्यतेनुसार, या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास हे नाव मिळाले आहे.

अधिक मासात आवर्जून कराव्यात या गोष्टी

श्री विष्णूंची उपासना: या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या महामंत्राचा नियमित जप करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते.

धार्मिक ग्रंथांचे पठण: घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम किंवा रामायणाचे वाचन करावे.

महादान: गरीब, गरजू आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, किंवा यथाशक्ती धन दान केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि जीवनातील दारिद्र्य दूर होते.

सात्विकता आणि स्नान: पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, उपवास पाळणे आणि संपूर्ण महिनाभर सात्विक जीवनशैलीचा अवलंब केल्याने आत्मशुद्धी होते.

अधिक मासात काय टाळावे?

शुभ कार्यांवर बंदी: अधिक मासात कोणतेही मांगलिक किंवा शुभ कार्य जसे की विवाह, मुंज, गृहप्रवेश, किंवा नवीन वस्तू/वाहनाची खरेदी करणे निषिद्ध मानले जाते.

तामसिक आहार वर्ज्य: या काळात मांस, मद्य आणि कांदा-लसूण यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.

वादविवाद आणि राग: हा काळ आत्मपरीक्षणाचा असल्याने कोणाशीही भांडण, वाद किंवा मनात नकारात्मक विचार आणू नयेत.

आध्यात्मिक संदेश

अधिक मास हा केवळ उपवास किंवा नियमांचा काळ नसून, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक उत्तम संधी आहे. वाईट सवयींचा त्याग करून, शिस्तबद्ध आणि भक्तीमय जीवन जगल्यास भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us