विषारी साप चावल्यानंतर देखील मांत्रिक प्राण कसे वाचवतात? काय आहे नेमकं कारण?

सोशल मीडियावर असे काही किस्से ऐकायला भेटतात, जे ऐकल्यानंतर लोकांना विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक प्रकार म्हणजे साप चावल्यानंतर झाडफुंक खरोखर जीव वाचवते का? जाणून घ्या सविस्तर

विषारी साप चावल्यानंतर देखील मांत्रिक प्राण कसे वाचवतात? काय आहे नेमकं कारण?
| Updated on: Jun 06, 2026 | 6:35 PM

भारतातील अनेक गावे आणि लहान शहरांमध्ये आजही साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा वेळी अनेकजण घाबरून जातात आणि रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी मांत्रिक, भोंदूबाबा किंवा झाडफुंक करणाऱ्यांकडे घेऊन जातात. अनेकदा अशा घटना ऐकायला मिळतात की झाडफुंक किंवा मंत्रोच्चार केल्यानंतर सापदंश झालेला व्यक्ती वाचला. त्यामुळे अनेकांच्या मनात तंत्र-मंत्रामुळे विष उतरते, अशी समजूत निर्माण होते. मात्र यामागील वैज्ञानिक सत्य काही वेगळेच आहे.

तज्ज्ञांच्या मते, साप चावल्यानंतर एखादी व्यक्ती झाडफुंक करूनही वाचली याचा अर्थ तिचा जीव तंत्र-मंत्रामुळे वाचला असे नाही. अनेक विषारी साप प्रत्येक वेळी चावताना विष सोडतातच असे नाही. काही वेळा ते केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा समोरच्याला घाबरवण्यासाठी चावतात. अशा प्रकारच्या चावण्याला ‘ड्राय बाइट’ किंवा ‘फॉल्स बाइट’ असे म्हटले जाते.

ड्राय बाइटमध्ये सापाचे दात त्वचेत घुसतात, परंतु शरीरात विष प्रवेश करत नाही. त्यामुळे व्यक्तीला गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत आणि ती कोणत्याही विशेष उपचारांशिवायही बरी होऊ शकते. अशा घटनांचा फायदा काही भोंदू मांत्रिक घेतात आणि रुग्ण बरा झाल्याचे श्रेय आपल्या झाडफुंकीला देतात.

संशोधन काय सांगते?

वैज्ञानिक अभ्यासांनुसार, विषारी सापांच्या चावण्याच्या सुमारे 20 ते 25 टक्के प्रकरणांमध्ये विष शरीरात प्रवेश करत नाही. अशा वेळी चावल्याचे निशाण दिसते, परंतु विषबाधेची गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक लोक चुकीच्या समजुतीत राहतात की तांत्रिक किंवा झाडफुंक करणाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले.

आरोग्य तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की, विषारी साप चावल्यास एकमेव प्रभावी उपचार म्हणजे वैद्यकीय उपचार आणि आवश्यक असल्यास अँटी-स्नेक व्हेनम देणे होय. झाडफुंक, मंत्र-तंत्र किंवा इतर अंधश्रद्धाळू उपायांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

ग्रामीण भागात आजही सापदंशाबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा प्रचलित आहेत. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आणि वेळेत वैद्यकीय उपचार घेणे हेच जीव वाचवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. साप चावल्यास झाडफुंक किंवा तंत्र-मंत्रावर विश्वास ठेवण्याऐवजी त्वरित रुग्णालय गाठणे हाच सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us