
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? केवळ या संदर्भातच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर जर तुमच्या घरात सुख, शांती नसेल, हातात पैसा टिकत नसेल, घरात सतत भांडणं होत असतील तर त्यावर देखील विविध उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो, परंतु हातात पैसा टिकत नाही, खर्च वाढतो. कायम पैशांची तंगी जाणवते, तसेच अनेकदा काहीही कारण नसताना घरात सारखी भांडणं होतात, तुम्ही घर कितीही शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील वाद हे होतातच. पत्नी -पत्नीमध्ये सारखी भांडणं होतात. अशा स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे सर्व दोष दूर होतात, अशाच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तुळशीचं झाड – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळशीचं झाडं असतं, त्या घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.
शंख – वास्तुशास्त्रामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात शंख असतो, त्या घराचं सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तिंपासून बचाव होतो, त्यामुळे देवघरात शंख असावाच असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
स्वस्तिक – वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक या चिन्हाला शुभ मानण्यात आलं आहे, त्यामुळे तुमच्या मुख्य घराच्या दरवाजावर स्वस्तिकचं चिन्ह असावं असं वास्तुशास्त्र सांगतं.
पाण्याने भरलेला कलश – घरामध्ये नेहमी पाण्यानं भरलेला कलश असावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
घंटी – तुमच्या देवघरात तांबे किंवा पितळापासून बनवलेली एक तरी घंटी असावी, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)