पंढरपूर, संत सावतामाळींच्या (Savtamali) भेटीला विठ्ठलाच्या पादुकांचे (Vitthal paduka)अरणकडे पंढरपुरातून प्रस्थान झाले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या टाळेबंदीनंतर यंदा प्रथमच पायी सोहळा निघाला. या सोहळ्यास 205 वर्षाची परंपरा आहे. विशेष म्हणजे या पालखी सोहळ्याला आता हजारोंची गर्दी होत असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याप्रमाणे सरकारने या सोहळ्याला देखील सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे. “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे म्हणत संत सावता माळी यांनी आपल्या शेतीमध्येच आणि आपल्या पिकांमध्येच विठ्ठल पाहिला. आषाढीला सारे संत पंढरीला आले असताना देखील , सावतामाळी हे शेतातच कार्यमग्न राहिले.
त्यामुळे आषाढीचा सोहळा झाल्यानंतर साक्षात विठ्ठलच सावता माळींच्या भेटीला माढा तालुक्यातील अरण या त्यांच्या मूळ गावी जाऊन पोहोचले. याच कथेनुसार गेल्या 205 वर्षापासून पंढरपुरातून आषाढीचा सोहळा झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुकांचा पालखी सोहळा हा संत सावतामाळींच्या गावी पायी निघतो. याच विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज पंढरपुरातून झाले. हा पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी येथील काशीकापडी समाज आणि नागेश गंगेकर व प्रसाद कळसे हे आहेत. मंगळवारी 26 जुलै रोजी हा सोहळा आष्टी, रोपळे ,मोडनिंब असा प्रवास करत अरण येथे जाऊन पोहोचणार आहे.