7 सप्टेंबर रोजी 9 तासांचा सुतक काळ, साडेतीन तासांचं चंद्रग्रहण; ही 5 कामे चुकूनही करू नये
7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणचा सुतक काळ 9 तासांचा असणार आहे. हा सुतक काळ अशुभ काळ मानला जातो. या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. चला जाणून घेऊयात.

या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे. विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे. वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. हे ग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि 1.26 वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे. ग्रहणाचा काळ हा सुतक काळ म्हटला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो. हा सुतककाळ 9 तासांचा असणार आहे. सुतककाळ हा ग्रहणाच्या 9 तास आधी सुरु होतो.म्हणजे या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल..त्यामुळे या 9 तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सुतक काळात अशी काही कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते. ती कोणती कामे आहेत चला जाणून घेऊयात.
सुतक काळ सुरू झाल्यानंतर कोणतीही पूजा करू नये.
ग्रहणाच्या अगदी 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो, जो अशुभ आहे. म्हणून, ग्रहणाच्या 9 तासाच्या सुतक काळात सर्वात आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा करण्यास मनाई केली आहे. आपण घरी आपल्या मंदीरालाही दार असेल तर ते बंद करावे किंवा मंदिरावर स्वच्छ कपडा घालून झाकून ठेवावे, ग्रहणाची सावली दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात.त्यामुळे घरातील मंदीरावर कपडा टाकून ठेवावा. तसेच तुम्ही हवे असल्यास नामजप करू शकता.
गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नये.
ज्योतिषशास्त्रात ग्रहण गर्भवती महिलांसाठी तर अशुभ मानले जाते. ज्योतिषीय शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये. किंवा कोणतेही काम करू नये. अन्यथा त्याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.भाज्या चिरू नये, किंवा कोणताही पदार्थ तळू नये असं म्हटलं जातं. एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणे कधीही चांगले.
अन्न शिजवणे आणि खाणे टाळा
ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळले पाहिजे. कारण त्या काळात शिजवलेले अन्न हे दुषित होते असं म्हटलं जातं. तसेच अशा वेळी बनवलेलं अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून, ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ते खाऊन घ्यावे. किंवा ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनही अन्न खाऊ शकता.
तुळशीची पाने तोडू नका.
ग्रहणकाळात तुळशीच्या पानांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते. यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यावेळी कोणत्याही देवतेला स्पर्श करू नका. रात्री तुळशी तोडू नये, परंतु सुतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीला स्पर्शही करू नका.
धारदार वस्तू वापरू नका.
ग्रहणकाळात धारदार वस्तू अजिबात वापरू नयेत. कात्री, चाकू, ब्लेड यांसारख्या गोष्टी वापरल्या जात नाहीत. याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )
