Chanakya Niti : आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं केव्हा समजायचं? जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. जन्माला येऊन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं कधी समजायचं? याबाबत चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात चाणक्य यांनी माणसाच्या आयुष्याबद्दल काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं केव्हा समजायचं? जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात?
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 10:04 PM

आर्य चाणक्य म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हाच तो आपल्या डोक्यावर कर्ज घेऊन जन्माला येत असतो. ज्यामध्ये पितृ ऋण, मातृ ऋण, गुरु ऋण अशा ऋणांचा समावेश असतो. त्यामुळे माणसावर मोठी जबाबदारी असते. आयुष्यात तुम्ही काहीही केलं तरी या तीन ऋणांमधून तुम्ही कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. मात्र तुम्ही जेव्हा तुमच्या कतृत्वाने तुमचे माता, पिता आणि गुरु यांना आनंद देता तेव्हा समजायचं की तुमचं आयुष्य सार्थकी लागलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच हे कर्तव्य असतं की कधीही असं कोणतंही कार्य करू नका ज्यामुळे तुमचे आई-वडील आणि गुरू यांची मान खाली जाईल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यात एक दिवस जरी जिंवत राहून चांगलं कार्य केलं तरी समजायचं तुमचं आयुष्य सार्थकी लागलं आहे. दोन माणसं असतात ज्यापैकी एक माणूस 100 वर्ष आयुष्य जगतो मात्र तो आपल्या आयुष्यात समाजाचं भलं होईल अशी एकही गोष्ट करत नाही. मात्र दुसरा व्यक्ती फक्त 50 वर्षच आयुष्य जगतो मात्र तो आपल्या आयुष्यात समाजाच्या भल्यासाठी अनेक गोष्टी करतो, अशा व्यक्तीचं आयुष्य सार्थकी लागलं असं मानावं, असं चाणक्य म्हणतात.

चाणक्य यांनी आपल्या याच ग्रंथामध्ये यशस्वी माणसांची लक्षणं देखील सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत काय घडलं आहे? याकडे फार लक्ष देऊ नका, भुतकाळात रमू नका. तसेच भविष्याची देखील जास्त चिंता करू नका. सध्या वर्तमान काळात काय घडत आहे, त्याकडे लक्ष द्या. आयुष्यात तुम्ही नक्की यशस्वी होणार. जे लोक भूतकाळात रमतात, किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनांचे स्वप्न पहाता ते आपल्या आयुष्यात फार काही करू शकत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात देव, तुमचे आई -वडील आणि गुरु यांना जर तुम्हाला सदैव आनंदी पहायचं असेल तर तुमचं कर्म सदैव चांगलं ठेवा. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. कारण तुमच्याकडे किती संपत्ती आहे? यावरून तुमचे आई-वडील आणि गुरु कधीही तुमच्या यशाचं मोजमाप करत नाहीत. तर तुम्ही किती चांगलं कार्य करत आहात? यावरून तुमच्या यशाचं मूल्यमापन ते करत असतात. जेव्हा तुमचं कर्म चांगलं असतं, तेव्हा तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळतो, तुम्हाला जेव्हा समाजात मान-सन्मान मिळतो तेव्हा तुमच्यापेक्षाही त्याचा जास्त आनंद तुमच्या आई-वडील आणि गुरु यांना होतो. जेव्हा तुमचे आई-वडील गुरू आनंदी असतात, तेव्हा समजायचं तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us