Shardul Thakur : ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरचं थेट गौतम गंभीर, शुबमन गिल विरोधात धक्कादायक वक्तव्य, माझा त्यांनी…
Shardul Thakur : शार्दुल ठाकूर उत्तम ऑलराऊंडर आहे. हार्दिक पंड्याला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण सध्या हा खेळाडू टीम इंडियात दिसत नाही. आता शार्दुल ठाकूरने केलेल्या एका स्टेटमेंटची बरीच चर्चा सुरु आहे. हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिलच्या विरोधात जाणारं हे स्टेटमेंट आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने टीम इंडियामध्ये पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याचवेळी त्याने एक मोठं वक्तव्य सुद्धा केलं आहे. मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी झाली. त्यावेळी टीम मॅनेजमेंटने आपला व्यवस्थित उपयोग केला नाही असं शार्दुल ठाकूरने म्हटलं आहे. टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याच्या आपल्या अपेक्षा कायम असल्याचं शार्दुल ठाकूरने स्पष्ट केलं. संधी मिळाल्यास देशासाठी पुन्हा सर्वोत्तम देईन असं शार्दुल म्हणाला. शार्दुल ठाकूरला मागच्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात फक्त दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्याचं प्रदर्शन सर्वसाधारण होतं. भारताचा लीड्समध्ये पराभव झालेला. मॅन्चेस्टर टेस्ट ड्रॉ झालेली. त्या सीरीज बद्दल बोलताना ठाकूरने आपली गोलंदाजी आणि रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
सीरीजमध्ये ऑलराऊंडर म्हणून खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरला दोन टेस्ट मॅचमध्ये फक्त 27 ओव्हर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की, “इंग्लंडमध्ये माझा योग्य पद्धतीने वापर झाला नाही. मला भरपूर कमी ओव्हर गोलंदाजी दिली. चुकीच्या टप्प्यांवर माझा वापर केला. मी म्हणीन कॅलकुलेशनमध्ये चूक झाल्या” त्या दौऱ्यात शुबमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन होता. गौतम गंभीर हेड कोच होते. शार्दुलने अप्रत्यक्षपणे कॅप्टन आणि कोचच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इंग्लंड दौऱ्यात पुरेशी संधी मिळाली नाही, असं शार्दुलच म्हणणं आहे.
मी त्या कठीण स्पेलचा सामना केला
या दौऱ्यात शार्दुल ठाकूरला फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्याने 1,4 आणि 41 धावा केल्या. शार्दुलने आपली चूकही मान्य केली. “फलंदाजी करताना लीड्समध्ये मी चूक केली. मी चुकीचा शॉट खेळलो. पण मॅन्चेस्टरमध्ये मी चांगली फलंदाजी केली. कारण तिथे आकाशात ढग होते, चेंडू स्विंग होत होता. पीचवर चेंडूला उसळी मिळत होती. मी त्या कठीण स्पेलचा सामना केला. भारताने पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यामुळे सामना ड्रॉ करता आला” असं शार्दुल म्हणाला.
माझ्या डोक्यात नेहमी ही गोष्ट सुरु असते
वर्षभरापूर्वी इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये शार्दुल ठाकूर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ही सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. “100 टक्के मला भारतासाठी पुन्हा खेळायचं आहे. माझ्या डोक्यात नेहमी ही गोष्ट सुरु असते. भले मी टीमच्या बाहेर असलो तरी अपेक्षा खूप मोठा शब्द आहे. जो पर्यंत अपेक्षा जिवंत आहे, तो पर्यंत सर्वकाही शक्य आहे” असं शार्दुल ठाकूर म्हणाला.