Sunil Gavaskar: वैभवला सतत डावलणं गावस्करांना पटत नाही; संताप व्यक्त केला अन् जे म्हणालं ते तुम्हालाही पटेल
भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आता यावर माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर प्रचंड भडकले आहेत.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसवल्यानंतर, चाहत्यांना आशा होती की बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात या युवा खेळाडूला संधी मिळेल. बीसीसीआयने टी-20 विश्वचषक जिंकलेल्या आपल्या सलामीवीरांनाच संधी दिली आणि वैभवला पुन्हा एकदा अंतिम 11 खेळाडूंमधून वगळण्यात आले. कालचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानमे निकाल काही लागला नाही. आता क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी वैभवच्या पदार्पण लांबणीवर एक विधान केले आहे.
सोनी स्पोर्ट्सवरील एका संभाषणादरम्यान, सुनील गावस्कर यांनी कबूल केले की “पदार्पण लांबल्याने अपेक्षा आणि दबाव दोन्ही वाढतात, परंतु वयाच्या 15व्या वर्षी खेळाडू या गोष्टींची चिंता करत नाही. कधी वैभवला संधी मिळेल, तेव्हा ही प्रतीक्षा त्याच्यावर नक्कीच थोडा अधिक दबाव टाकेल. पण 15 वर्षांच्या वयात तुम्ही दबावाबद्दल फारसा विचार करत नाही. वैभवला हे चांगलेच ठाऊक आहे की, जर त्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याला लगेचच चांगली कामगिरी करावी लागेल. ही गोष्ट त्याच्या मनात असेल.”
या दिग्गज फलंदाजाने पुढे सांगितले की, “या वयात वरिष्ठ संघाच्या ड्रेसिंग रूमचा भाग असणे ही स्वतःच एक मोठी गोष्ट आहे. सध्या फक्त संघासोबत राहूनच तो खूप आनंदी आहे. हा भारतीय संघ महान आणि अप्रतिम खेळाडूंनी भरलेला आहे आणि वैभवसाठी या दिग्गजांकडून शिकणे हा एक उत्तम अनुभव आहे.”
मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 189/7 अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. जरी संजू सॅमसन, इशान किशन आणि उपकर्णधार तिलक वर्मा पूर्णपणे अपयशी ठरले असले तरी, अभिषेक शर्माच्या 24 चेंडूत 59 धावा, कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार 68 धावा आणि शिवम दुबेच्या अखेरच्या षटकांतील नाबाद 42 धावांच्या जोरावर भारताने एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर झालेल्या पावसामुळे इंग्लंडला पाठलाग करता आला नाही. मालिकेतील दुसरा सामना 4 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये होणार असून, वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा तिथेच संपते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
