IPL मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?

| Updated on: Nov 13, 2020 | 11:25 PM

आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात (IPL 2021) सालाबादप्रमाणे मार्च महिन्यातच होईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.

IPL मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2020 FINAL) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात करत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासह यंदाच्या मोसमाचा शेवट झाला. यावेळेस कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला जवळपास 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात (IPL 2021) सालाबादप्रमाणे मार्च महिन्यातच होईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (BCCI Sourav Ganguly) व्यक्त केला होता. दरम्यान आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी दोन संघ दिसू शकतात. तसेच एका अंतिम 11 जणांच्या संघात (Playing Eleven) 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याबाबत विचार सुरु आहे. (BCCI official suggests increasing overseas players limit from 4 to 5 if IPL gears up for new teams)

दिवाळीनंतर नव्या संघांसाठी निविदा काढणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलमध्ये आणखी दोन नवे संघ समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी BCCI दिवाळीनंतर निविदा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश झाला तर खेळाडूंचा मोठा लिलाव होईल. दरम्यान सध्या ज्या फ्रेंचायजी आयपीएलमध्ये सहभागी आहेत, त्यांना नव्या दोन संघांचा विचार पटलेला नाही. कारण दोन नवे संघ आले तर त्यांच्याकडील सध्याचे काही खेळाडू बदलले जाऊ शकतात. त्यांनी तयार उभा केलेला संतुलित संघ बिघडू शकतो. शिवाय पुढील आयपीएलला फार वेळ शिल्लक नाही, नव्याने टीम उभी करण्यासाठी पुरेसा अवधी नाही.

सुरुवातीला अशी चर्चा होती की, आयपीएलच्या 14 व्या हंगामात (2021) एक आणि 15 व्या हंगामात (2022) एक असे दोन संघ समाविष्ट केले जाणार आहेत. तर आता अशी चर्चा आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या 14 व्या हंगामात दोन्ही नवे संघ सहभागी होऊ शकतात. दरम्यान बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू

आयपीएलमध्ये सध्या अंतिम 11 जणांच्या संघात केवळ 4 परदेशी खेळाडूंचा समावेश करता येतो. हा नियम स्पर्धेच्या सुरुवातीपासून कायम आहे. परंतु यामध्ये बदल करण्याबाबत विचार सुरु आहे. अंतिम 11 जणांच्या संघात जास्तीत जास्त 5 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. असं म्हटलं जातंय की, याचा संघाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल. अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

कोरोनामुळे लिलावाच्या कार्यक्रमात बदल?

दरवेळेस आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव करण्यात येतो. यामध्ये अनेक संघ खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात त्यांना समाविष्ट करुन घेतात. मात्र आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचा ऑक्शन कार्यक्रम महिन्याभराच्या विलंबाने होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनुसार मिळत आहे. याबाबत बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही यााआधी वक्तव्य केलं होतं.

आयपीएलमध्ये नवे संघ जोडले जाण्याची शक्यता असल्याने आयपीएलच्या इतर नियमांमध्ये बदल अपेक्षित असतील. यामध्ये साखळी फेरीतील संघाच्या सामन्यांची संख्या यासारख्या बाबींमध्ये बदल होऊ शकतो. यासर्व बाबींमुळे बीसीसीआय लिलावाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सविस्तररित्या घेण्यासाठी इच्छुक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

“कोरोनावरील लस सापडल्यास आयपीएल भारतात”

“येत्या फेब्रुवारी-मार्च पर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल, अशी आशा करुयात. असे झाल्यास नक्कीच आयपीएलच्या 14 व्या मोसमाचे आयोजन भारतात केले जाईल, असं सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. “तसेच जर कोरोनावर लस सापडली नाही, तर आपल्यासमोर स्पर्धेसाठी यूएईचा पर्याय आहेच”, असंही सौरवने नमूद केलं होतं. दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. काल (12 नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट संघ सिडनी येथे दाखल झाला आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या

IPL | 13 वर्षात मुंबईने पाचव्यांदा किताब जिंकला, ‘हे’ तीन संघ मात्र अजूनही विजेतेपदापासून दूर

IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल

(BCCI official suggests increasing overseas players limit from 4 to 5 if IPL gears up for new teams)