टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा-वरूण चक्रवर्तीला संघातून काढून टाका? नंबर 1 खेळाडूंवर संकट

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर भारताने स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. पण अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. यासाठी नंबर 1 अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती कारणीभूत आहेत.

टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा-वरूण चक्रवर्तीला संघातून काढून टाका? नंबर 1 खेळाडूंवर संकट
टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा-वरूण चक्रवर्तीला संघातून काढून टाका?
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 12:14 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील मोठी धावसंख्या असलेला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. या सामन्यात भारत आणि इंग्लंडचे मिळून 499 धावा झाल्या. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांची काय स्थिती झाली असेल याचा अंदाज येतो. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने 246 धावांपर्यंत मजल मारली आणि हा सामना भारताने फक्त 7 धावांनी जिंकला. संजू सॅमसनची खेळी आणि जसप्रीत बुमराहची गोलंदाजी प्रभावी नसती तर या सामन्याचा निकाल काही वेगळा असता. पण विजय हा विजय असतो. एकीकडे टीम इंडियाच्या विजयाने आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला चिंताही सतावत आहे. कारण टी20 क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर 1 गोलंदाज वरूण चक्रवर्ती या स्पर्धेत फेल गेले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.

अभिषेक शर्माला आणखी किती संधी?

अभिषेक शर्माची या स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली आहे. त्याने टीम इंडियाकडून पहिला चेंडू खेळला आणि शून्यावर बाद होत तंबूत परतला. अमेरिकेविरुद्धचा हा सामना सूर्यकुमार यादवमुळे वाचला. त्यानंतर सलग दोन सामन्यात अभिषेक शर्माला खातंही खोलता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या 15 धावांच्या खेळीला काहीच अर्थ नाही. झिम्बाब्वेविरुद्ध 55 धावांची खेळी करत फॉर्मात परतल्याचं बोललं जात होतं. पण वेस्ट इंडिजविरुद्ध 10 धावांवर तंबूत परतला. तर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 7 धावा करून बाद झाला. त्यामुळे या स्पर्धेतील एकूण 7 सामन्यात त्याने फक्त 89 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट आणि सरासरी खूपच घसरली आहे. त्यामुळे त्याला आणखी किती संधी द्यायची असा प्रश्न विचारला जात आहे. त्याच्या ऐवजी रिंकु सिंहचा पर्याय आहे.

वरूण चक्रवर्तीची गोलंदाजी पाहून चिंता वाढली

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपू्र्वी फॉर्मात असलेला वरूण चक्रवर्तीनेही टेन्शन वाढवलं आहे. त्याने 8 सामन्यात फक्त 13 विकेट घेतल्या आहे. पण त्याचा इकोनॉमी रेट 8.85 वर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या चार षटकात तर त्याने 64 धावा दिल्या. हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात वाईट परफॉर्मेन्स आहे. तर मागच्या सामन्यात त्याने फक्त 1-1 विकेट घेतल्या आणि तीन वेळा 40 हून अधिक धावा खर्च केल्या. त्यामुळे त्याच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान देण्याची मागणी क्रीडाप्रेमी करत आहेत. कारण अहमदाबादच्या खेळपट्टीवर कुलदीप यादव प्रभावी ठरू शकतो. पण आता संघ व्यवस्थापन शेवटच्या सामन्यात काय निर्णय घेते? याकडे लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us