
मुंबई: श्रीलंकेने बांगलादेशचा 2 विकेटने पराभव केला. या पराभवामुळे बांगलादेशच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. बांगलादेशच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. त्यांनी 183 धावां केल्या. मात्र तरीही बांगलादेशने सामना गमावला. एकवेळ श्रीलंकेचा संघ पराभूत होईल, अशी स्थिती होती. पण अखेरीस बांगलादेशच्या खराब गोलंदाजीचा त्यांनी फायदा उचलला. त्यांनी 4 चेंडू आधीच सामना संपवला. या पराभवानंतर बांगलादेशच्या कॅप्टनने अप्रत्यक्षपणे स्पिनर मेहंदी हसनला दोषी ठरवलं.
एका स्पिनरने नो बॉल टाकणं हा गुन्हा आहे, असं शाकिब अल हसन श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसनने श्रीलंकेविरुद्ध दोन नो बॉल टाकले. दोन्हीवेळा बांगलादेशच मोठं नुकसान झालं. मेहदी हसनच्या एका नो बॉलवर कुसल मेंडिस आऊट होता. मेंडिसने अर्धशतक फटकावून श्रीलंकेच्या विजयात मोलाच योगदान दिलं. शेवटच्या षटकातही मेहदी हसनने नो बॉल टाकला. त्यामुळे बांगलादेशचा संघ सामना हरला.
“आपल्या संघातील कुठल्याही खेळाडूने नो बॉल टाकावा, असं कुठल्याही कॅप्टनला वाटणार नाही. एका स्पिनरने नो बॉल टाकणं हे गुन्ह्यापेक्षा कमी नाही. आम्ही शिस्तबद्ध खेळ दाखवला नाही. दबाव कसा हाताळायचा, हे आम्हाला माहित नव्हतं. कुसल मेंडिस स्पिन गोलंदाजी चांगली खेळतो, त्यामुळे त्याला आऊट करणं गरजेच होतं. कुसलचे आम्ही दोन झेल सोडले. आऊट केलं, तो चेंडूही नो बॉल होता. आमचे स्पिनर नो बॉल टाकत नाहीत. पण आज दबावाखाली त्यांच्याकडून चूक झाली” असं शाकिब अल हसन म्हणाला.