“आम्हाला काहीच येत नाही…”, गावसकर रोहितवर संतापले, नक्की काय म्हणाले?

Sunil Gavaskar On Rohit Sharma : टीम इंडियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका गमावल्यानंतर दिग्गज आणि लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला आहे. गावसकरांनी रोहितला सुनावलं आहे.

आम्हाला काहीच येत नाही..., गावसकर रोहितवर संतापले, नक्की काय म्हणाले?
sunil gavaskar team india former cricketer
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 05, 2025 | 3:33 PM

टीम इंडियाने सिडनी कसोटी सामन्यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफी 1-3 अशा फरकाने गमावली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 विकेट्सने मात केली आणि तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या या अशा पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर चांगलेच संतापले. गावसकर यांनी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्यावर निशाणा साधला. गावसकर यांनी कुणाचं नाव घेतलं नाही, मात्र आपला संताप व्यक्त केला. माजी क्रिकेटपटूंना काहीच येत नाही. त्यामुळे आम्ही काय सल्ला देणार, असं म्हणत गावसकरांनी रोहितला सुनावलं. रोहित शर्माने शनिवारी लंचब्रेकनंतर स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत पत्रकार आणि माजी क्रिकेटपटूंवर निशाणा साधला होता. गावसकरांनी यावरुन हे उत्तर दिलं आहे.

गावसकर काय म्हणाले?

गावसकर यांनी सिडनी कसोटी सामन्याच्या निकालानंतर रोहितच्या प्रतिक्रियेचा चांगलाच समाचार घेतला.” टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी सराव करुन तयारी करायला पाहिजे होती का? तु्म्ही मालिकेआधीच तसा सल्ला दिला होतात”, असा प्रश्न गावसकरांना स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना विचारण्यात आला. गावसकरांनी या प्रश्नाला उत्तर देताना रोहितचं नाव न घेता चांगलंच सुनावलं. “अरे आम्हाला काही येत नाही. आम्हाला क्रिकेट माहित नाही. आम्ही तर फक्त टीव्हीवर बोलण्यासाठी आहोत. आमचं एकू नका, ते सर्व डोक्यावरुन जाउद्या”, असं गावसकर म्हणाले.

रोहित शर्मा काय म्हणाला होता?

रोहितने आऊट ऑफ फॉर्म असल्याने पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचं ठरवलं. त्यानंतर रोहित निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात होतं. रोहितने या निवृत्तीच्या वृत्तावंरुन माध्यमांवर आणि माजी क्रिकेटपटूंवर निशाणा साधला होता. “जी लोकं माईक, लॅपटॉप आणि पेन घेऊन आत बसले आहेत, त्यांनी आम्ही काय करायचं हे ठरवू शकत नाहीत. काय चूक आणि काय बरोबर हे आम्हाला माहित आहे. मी 2 मुलांचा बाप आहे. माझ्याकडे थोडं डोकं आहे. आयुष्यात काय करायचं हे मला माहित आहे, असं रोहितने म्हटलं.

रोहित फ्लॉप

दरम्यान रोहितने या मालिकेत क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. रोहितने या मालिकेतील एकूण 3 सामन्यांमधील 6 डावांत फक्त 31 धावा केल्या. रोहितची या मालिकेतील 10 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. रोहित या मालिकेत कर्णधार म्हणूनही अपयशी ठरला. रोहितने 3 सामन्यांत टीम इंडियाचं नेतृत्व केलं. टीम इंडियाला त्यापैकी 2 सामने गमवावे लागले. तर 1 सामना हा पावसाच्या मदतीने अनिर्णित राखण्यात यश आलं.