
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात खरं फलंदाजीचा कस लागला. पण त्यातून टीम इंडियाने आपलं कौशल्य दाखवत अमेरिकेला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे विजयी घोडदौड अशीच सुरू राहावी यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहे. असं असताना दुसरीकडे बीसीसीआय आपल्या नियमांची कठोर अमलबजावणी करत आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना पत्नी, मंगेतर किंवा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्यास मनाई केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबियांना सहभागी करण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली होती. पण बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार, 45 दिवसापेक्षा जास्त दौरा असल्यास कुटुंबियांना फार फार तर 14 दिवस राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धा फक्त एक महिन्यांची आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही.
गेल्या वर्षभरापासून द्विपक्षीय मालिकांमध्ये कुटुंबियांना संघासोबत राहण्याची परवानगी नाही. बीसीसीआयने हा नियम आताही कायम ठेवला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की टीम इंडिया व्यवस्थापनाने कुटुंबियांना सोबत प्रवास करू शकतात का? आणि राहू शकतात का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बीसीसीआयने स्पष्ट सांगितलं की कुटुंबियांना खेळाडूंसोबत एकत्र राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण जर त्यांनची इच्छा असेल तर स्वतंत्र व्यवस्था करू असंही सांगितलं आहे. टीम इंडिया साखळी फेरीतील तीन सामने भारतात आणि एक सामना श्रीलंकेत खेळणार आहे.
भारताने 2025 या वर्षात ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या दारुण पराभवानंतर बीसीसीआयने काही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. खरं कोविडनंतर खेळाडूंना कुटुंबियांना सोबत ठेवण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र काही खेळाडूंनी त्याचा गैरफायदा घेतला आणि वाटेल तसे वागू लागले. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम दिसून आला. इतकंच काय तर कुटुंबिय सोबत असल्याने काही खेळाडू संघाच्या बैठकांना दांड्या मारत होते. त्यामुळे बीसीसीआयने पुन्हा एकदा जुन्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.