टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी बीसीसीआयचा मास्टरप्लान! एकाच वेळी दोन संघ करणार तयार, कारण…

टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा दिसून आला आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू भारतीय भूमीत तयार झाले आणि होत आहेत. ही स्थिती पाहता बीसीसीआयने टीम इंडियाचे दोन संघ उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेतून याची चर्चा सुरू झाली आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी बीसीसीआयचा मास्टरप्लान! एकाच वेळी दोन संघ करणार तयार, कारण...
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी बीसीसीआयचा मास्टरप्लान! एकाच वेळी दोन संघ करणार तयार, कारण...
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 20, 2026 | 5:51 PM

क्रिकेट हा भारतीयांचा आत्मा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. तसेच आयसीसी स्पर्धांमध्येही भारतीय संघाचा वरचष्मा दिसून आला आहे. आता बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधघ्ये एक नाही तर दोन संघ उतरवण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने यासाठी योजना आखण्यास सुरूवात केली आहे. एक रिपोर्टमध्ये याबाबत दावा केला आहे. रिपोर्टनुसार, टी20 क्रिकेटमधील खेळाडूंची प्रतिभा पाहता बीसीसीआयने 30-35 खेळाडूंचा एक चमू बांधण्याचा निश्चय केल्याचं बोललं जात आहे. यानुसार टी20 क्रिकेटमध्ये दोन संघ तयार केले जाण्याची तयारी सुरू आहे. आयपीएल 2026 स्पर्धेनंतर या योजनेला खऱ्या अर्थाने सुरूवात होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळेल.

दोन संघ तयार करण्याचं कारण काय?

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटसाठी दोन संघ तयार करण्याची गरज काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर त्याचं उत्तर क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक आहे. भारतीय संघाला या वर्षाच्या शेवटापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. यात एशियन गेम्स आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिकेचा समावेश आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय या स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून रणनिती आखण्यावर जोर देत आहे. कारण या वर्षी आशियाई खेळ आणि भारत-वेस्ट इंडिज टी20 मालिका एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे दोन संघ बांधण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी 30-35 खेळाडूंचा एक चमू बांधला जाणार आहे.

बीसीसीआय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयर्लंड दौऱ्यावर खेळाडूंची एक चमू तयार केला जाईल. तर आशिया खेळाडूसाठी हा नियम लागू असेल. तेथेही अशीच रणनिती असेल. या 30-35 खेळाडूंमध्ये नवे चेहरे सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यांची नाव अजूनही निश्चित नाही. पण आयपीएल 2026 स्पर्धेतील फॉर्मवर सर्वकाही ठरणार आहे. यात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार असे खेळाडू आघाडीवर आहेत. गोलंदाजीत अशोक शर्मा,कार्तिक त्यागी, रवि बिश्नोई यांची नावे पुढे आहेत. तर विकेटकीपिंगसाठी ध्रुव जुरेल नाव चर्चेत आहे. तर अष्टपैलू खेळाडूंसाठी शशांक सिंह, अनुकूल रॉय यांची नावे घेतली जात आहेत. तर दुसऱ्या संघाचा नेतृत्व कोण करणार? असाही प्रश्न आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, एका संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असेल.

Follow Us