मुंबई: एजबॅस्टन कसोटीचे पहिले तीन दिवस टीम इंडिया फ्रंटफुटवर होती. टीमच्या विजयाची शक्यता दिसत होती. पण चौथ्या दिवशी खेळ पलटला. भारतीय संघ इतका खराब खेळला की, पराभवाची शक्यता दिसू लागली आहे. इंग्लंडला (IND vs ENG) पाचव्या दिवशी विजयासाठी 119 धावांची आवश्यकता असून 7 विकेट शिल्लक आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Baristow) हे इंग्लंडचे दोन महत्त्वाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. दोघांनी आपली अर्धशतक झळकावली आहेत. भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (Vikram Rathour) यांनी फलंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राठोर यांच्या मते, भारतीय फलंदाजांनी योग्य फटक्यांची निवड केली असती, तर इंग्लंडचा संघ विजयाच्या जवळपासही फिरकू शकला नसता.
विक्रम राठोर एजबॅस्टन कसोटीचा चौथा दिवस संपल्यानंतर म्हणाले की, “चौथ्या दिवशी आम्ही सामन्य क्रिकेट खेळलो, हे मला मान्य आहे. आम्ही पुढे होतो आणि त्या स्थितीत होतो, जिथून प्रतिस्पर्धी संघाला सामन्याबाहेर करता आलं असतं. पण असं घडलं नाही. आमच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना ती मोठ्या धावसंख्येमध्ये बदलता आली नाही. आम्ही खेळाडूंकडून मोठ्या इनिंगची भागीदारीची अपेक्षा करत होतो” इंग्लंडची शॉर्ट पीच चेंडूंची रणनिती भारताविरोधात यशस्वी ठरल्याचं त्यांनी मान्य केलं.
इंग्लंडचे वेगवान गोलंदाज शॉर्ट चेंडूंचा वापर करणार हे आपल्याला पहिल्यापासून माहित होतं, असं राठोर म्हणाले. “आम्ही योग्य रणनितीचा अवलंब करण्याची गरज होती. खेळाडूंनी शॉर्ट चेंडूंवर फटके खेळण्याचे प्रयत्न केले. पण हे फटके चुकले. पुढच्यावेळी आमच्यासमोर अशी स्थिती येऊ शकते, त्यामुळे त्यावर काम करण्याची गरज आहे. या लेव्हलवर क्रिकेट खेळताना तुमच्याविरोधात शॉर्ट चेंडूंचा वापर होणार, त्यामुळे तुम्हाला तयार असलं पाहिजे” असं राठोर यांनी सांगितलं.
एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करेल, अशी राठोर यांना आशा आहे. “इंग्लंड समोर मोठं लक्ष्य आहे. अजूनही त्यांना 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. दोन विकेटही मॅचची दिशा बदलू शकतात. बुमराह आणि शमी ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत, ते जरुर विकेट घेऊ शकतात” असा विश्वास राठोर यांनी व्यक्त केला.