पहिल्या T20 विश्वविजयाला 14 वर्षे पूर्ण, प्लेईंग इलेव्हनमधील एकमेव खेळाडूची 2021 विश्वचषकासाठी निवड!

| Updated on: Sep 24, 2021 | 1:44 PM

भारतीय संघ पहिल्या टी ट्वेण्टीचा चॅम्पियन होईल असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नव्हतं. पण धोनीच्या नेतृत्त्वातील युवा ब्रिगेडने सर्व अंदाज चुकीचे ठरवत इतिहास रचला. टी -20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारताने क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाला नवी दिशा दिली.

पहिल्या T20 विश्वविजयाला 14 वर्षे पूर्ण, प्लेईंग इलेव्हनमधील एकमेव खेळाडूची 2021 विश्वचषकासाठी निवड!
Team India T 20 world cup
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अतिशय खास दिवस म्हणजे 24 सप्टेंबर हा दिवस आहे. 14 वर्षांपूर्वी 2007 मध्ये आजच्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या युवा ब्रिगेडने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करून पहिला टी -20 विश्वचषक जिंकला होता.

भारतीय संघ पहिल्या टी ट्वेण्टीचा चॅम्पियन होईल असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नव्हतं. पण धोनीच्या नेतृत्त्वातील युवा ब्रिगेडने सर्व अंदाज चुकीचे ठरवत इतिहास रचला. टी -20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारताने क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाला नवी दिशा दिली. परिणामी, भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) 2008 मध्ये आयपीएल (IPL) सुरू करण्याचा निर्णय घेतला.

गौतम गंभीरची जबरदस्त खेळी

टी -20 विश्वचषकात झालेली भारत-पाकिस्तानची फायनल क्रिकेटप्रेमी आजही विसरु शकत नाहीत. दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते, परंतु अंतिम सामना पाहता बरेच काही पणाला लागले होते. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 157/5 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. सलामीवीर गौतम गंभीरने भारतासाठी 54 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. गंभीरने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. गंभीर व्यतिरिक्त युवा फलंदाज रोहित शर्माने शेवटच्या षटकात नाबाद 30 धावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारताचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली पाकिस्तानी टीम सुरुवातीपासूनच अडखळली. पाकिस्तानने 77 धावांत सहा विकेट्स गमावल्या. पण मिसबाह-उल-हक (43) ने एका बाजूने खिंड लढवून भारतीय संघाची चिंता वाढवली होती. मिसबाहने यासिर अराफत (15) आणि सोहेल तनवीर (12) यांच्यासह महत्त्वाची भागीदारी करुन, पाकिस्तानला विजयाजवळ आणून ठेवलं होतं.

शेवटच्या षटकात थरार

पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. त्यांच्या हातात एक विकेटच शिल्लक होती. या रोमांचक क्षणी कर्णधार धोनीने वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माकडे गोलंदाजीची धुरा दिली. जोगिंदरने पहिला चेंडू वाईड टाकतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानला सहा चेंडूत 12 धावांची गरज होती.

मिसबाहने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून टीम इंडियाला अडचणीत आणले. मग पाकिस्तानला चार चेंडूत सहा धावांची गरज होती. जोगिंदरच्या पुढच्या चेंडूवर मिसबाहने स्कूप शॉट मारला. एका क्षणी असे वाटले की चेंडू सीमा ओलांडेल. पण फाईन लेगवर उभा असलेल्या श्रीशांतने झेल टिपला आणि तमाम भारतीयांच्या जीवात जीव आला.

भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत 16 धावा देऊन 3 गडी बाद केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी मालिकावीर ठरला. आफ्रिदीने वर्ल्डकपमध्ये 12 विकेट घेतल्या होत्या, तर फलंदाजीत त्याने 91 धावा केल्या.

अंतिम सामना जिंकल्यानंतर कर्णधार धोनी म्हणाला, ‘हा विजय त्या गोष्टींपैकी एक आहे जी आठवण मी आयुष्यभर जपणार आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार. कोणीही आम्ही जिंकू अशी अपेक्षा केली नव्हती. मात्र आज आम्ही ज्या प्रकारे खेळलो, ते पाहता मोठ्या सेलिब्रेशनसाठी पात्र आहोत.

टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळलेली टीम इंडिया

गौतम गंभीर, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, इरफान पठाण, हरभजन सिंग, ज्योगिंदर शर्मा, श्रीशांत, आर पी सिंह

2021 साठी एकमेव खेळाडूची निवड 

दरम्यान, 2021 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकासाठी 2007 मधील एकमेव खेळाडूची निवड झाली आहे. हा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा होय.

संबंधित बातम्या  

Eoin Morgan : मुंबईविरुद्ध सोपा विजय, तरीही कोलकाताच्या कर्णधाराला मोठा झटका