30 वर्षांनंतर कमबॅक करणार मीनाक्षी शेषाद्री? दिसणार या वेब सीरिजमध्ये
विपुल शाह यांच्या वेब सीरिजमधून मीनाक्षी शेषाद्री जॅकी श्रॉफसोबत पुनरागमन करणार असल्याची शक्यता आहे. या सीरिजद्वारे ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

८०-९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब होती. ती परदेशात स्थायिक झाली होती. आता मीनाक्षी शेषाद्री कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत आणि तेही ४० वर्षांपूर्वीचे सहकलाकार जॅकी श्रॉफ यांच्यासोबत. रिपोर्ट्सनुसार, मीनाक्षी शेषाद्री जैकी श्रॉफसोबत पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसणार आहे. मात्र यावेळी हा कोणतीही चित्रपट नसून एक वेब सीरीज असल्याचे म्हटले जात आहे.
सिनेमात दिसणार की सीरिजमध्ये?
मिड-डे च्या रिपोर्टनुसार, मीनाक्षी शेषाद्री विपुल शाह यांच्या ‘नानावती vs नानावती’ या वेब सीरीजच्या माध्यमातून पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या सीरिजमध्ये मीनाक्षी शेषाद्रीसोबत जैकी श्रॉफ काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. कित्येक दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. दोघे यापूर्वी १९८३ च्या सुपरहिट चित्रपट ‘हीरो’ मध्ये एकत्र दिसले होते.
या सीरीजमध्ये मीनाक्षी शेषाद्री यांच्यासोबत भाग्यश्री, राम कपूर आणि अनुप्रिया गोयनका देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शेषाद्री या परदेशातून पुन्हा भारतात स्थायिक झाल्याचे बोलले जात होते. यावेळी त्या अभिनय करिअरसाठी मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक होणार असल्याचे समोर आले आहे. मीनाक्षी यांनी मुंबईत पाऊल ठेवताच त्यांना मोठी वेब सीरीज मिळाली आहे. या सीरिजच्या माध्यमातून त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत.
सीरीजबद्दल जाणून घ्या
‘नानावती vs नानावती’ ही ८ एपिसोडची वेब सीरीज असेल. याचे शूटिंग अंधेरी वेस्ट येथे होणार आहे. सीरीजबाबत सर्वात मोठी चर्चा म्हणजे मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तसेच भाग्यश्री आणि राम कपूर यांची जोडीही दिसणार आहे.
मीनाक्षी आणि जॅकी यांनी यापूर्वी ‘हीरो’, ‘दहलीज’ आणि ‘अल्लाह रक्खा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यातील ‘हीरो’ ही त्यांची सर्वात यशस्वी फिल्म ठरली होती. मीनाक्षी शेषाद्री यांनी लग्नानंतर चित्रपटांपासून अंतर ठेवले होते. त्यांचा शेवटचा सिनेमा ‘घातक’ (१९९६) प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी बँकर हरीष मैसूर यांच्याशी लग्न केले आणि दोघे अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्या भरतनाट्यम क्लासेसही चालवत होत्या.
