IND vs PAK: हरमनप्रीत कौरने ढुंकूनही पाहीलं नाही, आशिया कपनंतर वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची नाचक्की

आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय महिला संघाने पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली. नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. हरमनप्रीत कौरने नाणेफेकीनंतर हात मिळवला नाही. त्यामुळे पाकिस्तान येथेही तोंड खाली घालून राहावं लागलं.

IND vs PAK: हरमनप्रीत कौरने ढुंकूनही पाहीलं नाही, आशिया कपनंतर वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची नाचक्की
IND vs PAK: हरमनप्रीत कौरने ढुंकूनही पाहीलं नाही, आशिया कपनंतर वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची नाचक्की
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 2:52 PM

दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानची आता सर्वच स्तरावर नाचक्की होत आहे. क्रिकेटच्या मैदानातही अपमानित व्हावं लागत आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानसोबत नो हँडशेक पॉलिसी लागू केली होती. इतकंच काय तर पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारली नव्हती. आता भारतीय महिला संघ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अशीच रणनिती अवलंबणार का? याकडे लक्ष लागून होतं. भारतीयांच्या मनासारखंच झालं. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. नाणेफेकीवेळी पाकिस्तान संघापासून दोन हात लांबच राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला अपमानित होण्याची गेल्या 30 दिवसातील ही चौथी वेळ आहे. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेत होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील कोलंबोत होत आहे.

नाणेफेकीवेळी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना आणि भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात आली. नाणेफेक हरमनप्रीत कौरने केली आणि कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. तेव्हा हरमनप्रीत कौर लगेचच बाजूला झाली. यावेळी हात मिळवणी करण्याचा प्रश्नच राहिला नाही. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच निर्णयाबाबत सांगितलं. हरमनप्रीत कौर तिच्यापासून लांबच होती. त्यामुळे तिला मान खाली घालून जावं लागलं. नाणेफेकीनंतर फातिमा सना म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. असे दिसते की खेळपट्टीवर थोडा ओलावा असू शकतो. आमच्या संघात एक बदल आहे. आमचा आत्मविश्वास चांगला आहे, आशा आहे की आपण आज चांगले खेळू. 250 पेक्षा कमी धावसंख्या हा एक चांगला पाठलाग असू शकतो.’

आशिया कप स्पर्धेप्रमाणे बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनकरून असे आदेश दिल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार भारतीय क्रिकेट आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘विश्वचषकापूर्वी आम्ही येथे चांगली मालिका खेळलो. आम्ही सकारात्मक विचार करत आहोत आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक दुर्दैवी बदल करावा लागत आहे. अमनजोत खेळत नाही. रेणुका ठाकूर खेळत आहे. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली आहे आणि आजच्या सामन्यासाठी उत्सुक आहोत.’

भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं होतं. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी, तर पाकिस्तान या सामन्यातील पहिला विजय मिळवण्यास उत्सुक आहे. भारत आणि पाकिस्तान वनडे क्रिकेटमध्ये 11 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने 11 वेळा पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. आता तसंच झालं तर भारताचा हा 12वा विजय असेल.