Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

| Updated on: Feb 08, 2022 | 8:27 AM

पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू दुसऱ्या मॅचमध्ये नाही चालला, तर त्याजागी दुसरा खेळाडू ती कसर भरुन काढायचा. गोलंदाजीमध्येही तसंच होतं. या अशा सांघिक कामगिरीमुळेच भारताचा युवा संघ पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकू शकला.

Under 19 World cup: हे आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स
Follow us on

मुंबई: नुकत्याच संपलेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (ICC under 19 World cup) भारताने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. अंडर 19 गटात अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील एकमेव संघ आहे. भारताने सलग चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणारा सर्व बाजूंनी संतुलित असा हा संघ होता. वेगवान तसंच फिरकी गोलंदाजी, फलंदाजी आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारे खेळाडू या संघात होते. त्यामुळे ठराविक खेळाडूंवर हा संघ अवलंबून नव्हता. पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू दुसऱ्या मॅचमध्ये नाही चालला, तर त्याजागी दुसरा खेळाडू ती कसर भरुन काढायचा. गोलंदाजीमध्येही तसंच होतं. या अशा सांघिक कामगिरीमुळेच भारताचा युवा संघ पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकू शकला. भारताच्या या अंडर 19 वर्ल्डकप टीममध्ये महाराष्ट्राचे चार खेळाडू होते. राजवर्धन हंगरगेकर, कौशल तांबे, (Kaushal Tambe) विकी ओस्तवाल आणि अंगकृष रघुवंशी. या चौघांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये आवश्यकतेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या वर्ल्डकपमधली त्यांची कामगिरी जाणून घेऊया.

राजवर्धन हंगरगेकर: हा खेळाडू मूळचा उस्मानाबादचा. मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने गोलंदाजी आणि फलंदाजीत दोघांमध्ये योगदान दिलं. वर्ल्डकपच्या सहा सामन्यांमध्ये खेळताना त्याने एकूण पाच विकेट काढल्या. दुसऱ्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात तर त्याने 17 चेंडूत 39 धावा तडकावल्या. यात एक चौकार आणि पाच षटकार होते. उस्मानाबाद सारख्या छोट्या शहरातून आलेला हा एक गुणवान ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे.

कौशल तांबे: हा मुळचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून कौशलची भारतीय संघात निवड झाली. त्याने सुद्धा गरजेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कौशलने 35 धावा केल्या. त्यानंतर ऑफब्रेक गोलंदाजी करणाऱ्या कौशलने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दोन विकेट घेतल्या, तर फायनलपर्यंतच्या सामन्यांमध्ये एक-दोन विकेट घेऊन योगदान दिलं. चॅलेंजर ट्रॉफी आणि विनू मंकड स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली. सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विनू मंकड करंडक स्पर्धेत तांबेने 54.67 च्या सरासरीने 328 धावा केल्या. चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत त्याने 67 च्या सरासरीने 134 धावा केल्या. कौशल तांबे महाराष्ट्राच्या पश्चिम विभागासाठी खेळतो. कौशलचे वडिल एसीपी असून ते पोलीस दलात आहेत. त्यामुळे घरात एक प्रकारची शिस्त आहे. शाळेत असल्यापासून तो क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण सुरु केलं. क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम आहे.

विकी ओस्तवाल : हा पुण्याचा खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधली चांगल्या कामगिरीमुळे त्याच्यासाठी अंडर-19 संघाचे दरवाजे उघडले. डावखुरी गोलंदाजी करणाऱ्या विकीने आपल्या फिरकीच्या तालावर वेस्ट इंडिजमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नाचवलं. पहिल्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने कमाल केली. पाच विकेट घेऊन आफ्रिकेचा निम्मा संघ त्याने तंबूत पाठवला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. स्पर्धेत त्याने भारताकडून सर्वाधिक 12 विकेट घेतल्या. विनू मंकड करंडक स्पर्धेत विकीने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले होते. त्याने 291 धावा करताना 11 विकेट घेतल्या. आशिया कप स्पर्धेत त्याने 2.29 च्या सरासरीने त्याने आठ विकेट घेतल्या.

अंगकृष रघुवंशी: हा अंडर-19 वर्ल्डकपमध्ये निवड झालेला मुंबईचा एकमेव खेळाडू आहे. रघुवंशीची फलंदाजी पाहून आपल्याला किशोरवयातला रोहित शर्मा आठवतो असे मुंबईच्या अंडर-19 चे मुख्य निवडकर्ते अतुल रानडे यांनी सांगितले होते. अंगकृषने या वर्ल्डकपमध्ये भारताकडून सहा सामन्यांमध्ये सर्वाधिक 278 धावा केल्या. यात एक अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. आयर्लंड विरुद्ध त्याने 79 तर युगांडा विरुद्ध 144 धावांची शतकी खेळी केली. अंगक्रिष रघुवंशी मूळचा दिल्लीचा आहे. पण वयाच्या 11 वर्षापासून तो मुंबईत राहतोय. तेव्हापासून तो मुंबईचे प्रतिनिधीत्व करतोय. मुंबईचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायर यांच्याकडे त्याने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. रघुवंशीच टॅलेंट पाहून नायर यांनीच मुंबईत पवईमध्ये त्याच्यासाठी घराची व्यवस्था करुन दिली.

संबंधित बातम्या:
IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?
IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?
तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

ICC Under 19 World cup four players from maharashtra played important role kaushal tambe rajvardhan hangargekar vicky ostwal angkrish raghuvanshi