IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग कठीण होत जाणार आहे. असं असताना आरसीबीविरुद्धच्या पराभवाचं विश्लेषण कर्णधार ऋतुराज गायकवाड याने केलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात एकदम सुमार झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्नांना सुरूवातीलाच धक्का बसला आहे. कारण तीन पराभवाचं डॅमेज भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला. नाणेफेकीचा कौल हा चेन्नईच्या बाजूने लागला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजी निवडली. खरं तर नाणेफेक जिंकून गोलंदाजी आल्याने हा सामना चेन्नईच्या बाजूने झुकला असंच वाटलं. पण आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरला. 20 षटकात 250 धावा करत इतिहास रचला. तसेच चेन्नई सुपर किंग्सला 19.4 षटकात 207 धावांवर गुंडाळलं. चेन्नई सुपर किंग्सचा 43 धावांनी पराभव झाला.
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला या पराभवानंतर मोठा फटका बसला. चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत थेट शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे. या पराभवाचं विश्लेषण करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘पराभवासाठी मी निश्चितच जबाबदार आहे. जर मी क्रीजवर जास्त वेळ थांबलो असतो आणि संघासाठी अधिक योगदान दिले असते, तर निकाल वेगळा लागला असता. सुरुवातीलाच विकेट गमावणे हा संघासाठी मोठा धक्का होता.’ दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढच्या सामन्यासाठी सज्ज असल्याचं त्याने सांगितलं. पुढचा सामना जिंकून सीएसके आपल्या विजयाचे खाते उघडेल, असा विश्वास ऋतुराज गायकवाडने व्यक्त केला.
चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 11 एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी समोर दिल्ली कॅपिटल्सचा संघ असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेत 31 वेळा भिडले आहेत. यात 19 वेळा चेन्नई सुपर किंग्सने, तर 12 वेळा दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. खरं तर ही आकडेवारी पाहिली तर चेन्नई सुपर किंग्सचं पारडं जड वाटतं. पण चेन्नई सुपर किंग्सची या स्पर्धेतील सुमार सुरूवात पाहता दिल्ली कॅपिटल्सला संधी आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सने सुरूवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. त्यामुळे आता या सामन्यात काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे.