
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा आज अमेरिकेविरुद्ध सामना आहे. ग्रुप A मध्ये या दोन्ही टीम्स आहेत. सुपर-8 फेरी गाठण्यासाठी ग्रुप A मधील स्थिती खूपच रोमांचक बनली आहे. 2007 मध्ये टीम इंडियाने पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडिया आज अमेरिकेविरुद्धचा सामना अजिबात हलक्यामध्ये घेणार नाही. कारण अमेरिकेने या वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन केलय. अमेरिकेने सुरुवातीला कॅनडाला नंतर पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला पराभवाचा पाणी पाजलय. T20 वर्ल्ड कप आधी अमेरिकेच्या टीमने द्विपक्षीय सीरीजमध्ये बांग्लादेशवर विजय मिळवला होता. ग्रुप A मध्ये अमेरिका आणि भारत या दोनच टीम अशा आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीय. आज मात्र या दोन टीमपैकी एक संघ हरणार हे निश्चित आहे.
टीम इंडियाने रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. हरण्याच्या स्थितीतला सामना टीम इंडियाने जिंकला. पाकिस्तानच्या बाजूने विजयाच पारड 97 टक्के तर भारताच्या बाजूने फक्त 2 टक्के होतं. तरीही, जसप्रीत बुमराहच्या बळावर टीम इंडियाने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. महत्त्वाच म्हणजे या सामन्यात पाकिस्तान समोर विजयासाठी अत्यंत माफक अवघ्या 120 रन्सच टार्गेट होतं.
कुठल्या टीमचा किती रनरेट?
सध्या ग्रुप A मध्ये टीम इंडियाचा 2 सामन्यात 4 पॉइंटसह NRR +1.455 आहे. त्यानंतर अमेरिकेचा 2 सामन्यात 4 पॉइंटसह NRR +0.626 आहे. पाकिस्तानचा 3 सामन्यात 2 पॉइंटसह NRR +0.191 आहे. कॅनडा 3 सामन्यात 2 पॉइंटसह NRR -0.493 आहे. आयर्लंड 2 सामन्यात 0 पॉइंटसह NRR -1.712 आहे. आज ग्रुप A मधील भारत विरुद्ध अमेरिका सामन्याचा सुपर-8 च्या क्वालिफिकेशनवर काय परिणाम होणार आहे? ते जाणून घेऊया.
आजच्या सामन्यात पाकिस्तानची काय अपेक्षा असेल?
भारताने आजचा सामना जिंकला, तर ते सुपर-8 राऊंडमध्ये पोहोचतील. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीम्स आधीच तिथे पोहोचल्या आहेत. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच आव्हान सुद्धा जिवंत राहील. त्यांनी काल कॅनडावर विजय मिळवला. भारताने अमेरिकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा, जेणेकरुन अमेरिकेच्या रनरेटला फटका बसेल. कारण सध्या अमेरिकेचा रनरेट पाकिस्तान पेक्षा चांगला आहे.
अमेरिका हरली तरी त्यांच्याकडे अजून एक संधी असेल. आयर्लंड विरुद्धचा त्यांचा सामना बाकी आहे.
अमेरिकेने भारताला हरवलं, तर….
अमेरिकेने आज भारताविरुद्धचा सामना जिंकला, तर ते थेट सुपर-8 मध्ये जातील. पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड या तिन्ही टीम्ससाठी हा रिझल्ट अजिबात चांगला नसेल. भारत हरल्यानंतरही त्यांचा शेवटचा सामना दुबळ्या कॅनडा विरुद्ध आहे. त्यामुळे भारताकडे सुपर-8 मध्ये जाण्याची संधी असेलच.