
कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत धमाका केला आहे. टीम इंडियाने नागपूर, रायपूरनंतर गुवाहाटीत सामने जिंकून विजयी हॅट्रिक केली आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 जानेवारीला विशाखापट्टणममध्ये होणार आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव याला खास कामगिरी करण्याची संधी आहे.
सूर्याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यापासून टीम इंडिया अजिंक्य आहे. भारताने एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. सूर्याला गेली काही महिने धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र सूर्याला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतून सूर गवसला. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20i सामन्यात अर्धशकक झळकावलं. सूर्याने अशाप्रकारे या 3 सामन्यांच्या मालिकेतील 3 डावांत एकूण 171 धावा केल्या आहेत. आता सूर्या इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. 3 हजार टी 20i धावा पूर्ण करण्याची संधी आहे. सूर्याला त्यासाठी फक्त 41 धावांची गरज आहे.
सूर्याने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 102 सामन्यांमध्ये 2 हजार 959 धावा केल्या आहेत. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध विशाखापट्टणमध्ये चौथ्या टी 20i सामन्यात 41 धावा केल्या तर तो भारतासाठी अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरेल. आतापर्यंत भारतासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीच अशी कामगिरी केली आहे. तसेच एकूण 11 फलंदाजांनाच असा कारनामा करता आला आहे.
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 4 हजार 231 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 4 हजार 188 टी 20i धावा केल्या आहेत. मात्र रोहित आणि विराट टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
दरम्यान सूर्याला न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेआधी टीकेचा सामना करावा लागला. सूर्याला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे सूर्यावर कामगिरीवरुन टीका करण्यात येत होती. मात्र सूर्याला न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेतून सूर गवसला. सूर्याने नागपूरमध्ये 32, रायपूरमध्ये नाबाद 82 आणि गुवाहाटीत 57 धावांची खेळी केली. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव विशाखापट्टणममध्ये अर्धशतकाची हॅट्रिक पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.