IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यावर सर्वात मोठं संकट, मॅच सुरू होण्याआधीच चिंता वाढवणारी बातमी समोर!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना कोलंबो शहरात खेळवला जाणार असून त्यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यावर सर्वात मोठं संकट, मॅच सुरू होण्याआधीच चिंता वाढवणारी बातमी समोर!
ind vs pak match
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2026 | 5:19 PM

India Pakistan Match : सध्या जगभरात टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची चर्चा चालू आहे. या स्पर्धेत प्रत्येकवेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा जगभरातील क्रिकेटचे चाहते सगळं काम सोडून सामना पाहायला बसतात. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने दिसणार आहेत. श्रीलंकेत हा सामना होत असून तो संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. असे असतानाच आता या सामन्यावर नवं संकट उभं ठाकलं आहे. हा सामना होणार की नाही, याबाबत गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनिश्चितता होती. चर्चा आणि बैठकांनंतर पाकिस्तानने आम्ही भारताविरोधात सामना खेळण्यास तयार आहोत, असे सांगितले. असे असतानाच आता या पूर्ण सामन्याची तयारी झालेली असताना वाईट बातमी समोर येत आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आजचा भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. परंतु त्याआधीच या सामन्यावर संकट आले आहे. येथे पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक चांगली बाब म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत या स्टेडियमच्या परिसरात कोणताही पाऊस झालेला नाही. त्यामुळे हा सामना होण्याची शक्यता अजूनही कायम आहे.

पावसाची शक्यता काय?

सकाळी या भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर मात्र पाऊस झालेला नाही. सामना सुरू झाल्यानंतरही पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अजूनही स्टेडियमवर काळे ढग जमा झालेले आहेत. त्यामुळेच पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाची रिमझिम सुरू झाली तर नाणेफेकीलाही उशीर होऊ शकतो. सध्याच्या अंदाजानुसार या भागात पाऊस होण्याची शक्यता 60 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

अॅक्यूवेदरनुसार संध्याकाळी पाच वाजता पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सहा वाजता पाऊस होण्याची शक्यता ही 50 टक्के आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.