IND vs SL 2nd Test: भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ, नेमकं काय चुकलं?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला आहे. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. मात्र दिनुषाच्या झुंजार खेळीने भारताचं विजयाचं स्वप्न भंगलं.

IND vs SL 2nd Test: भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ, नेमकं काय चुकलं?
भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ, नेमकं काय चुकलं?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 27, 2026 | 5:10 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा निकाल अखेर लागला आहे. या सामन्यात भारताच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र त्यावर सोनल दिनुषाने पाणी टाकलं. त्यामुळे हा सामना अखेर ड्रॉ झाल्याचं घोषित करण्यात आला आहे. भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असला तरी ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देऊनही सामना जिंकण्यात अपयश आलं हे विशेष.. श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. शुभमन गिलचे बचावात्मक नेतृत्व आणि पावसाचा व्यत्यय यामुळे भारताचा हातून विजय निसटला असंच म्हणावं लागेल.

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. तसेच पहिल्या डावात 503 धावा करून डाव घोषित केला. श्रीलंकेला पहिल्या डावात 290 धावांवर रोखलं आणि 214 धावांची आघाडी घेतली. यासह भारताने फॉलोऑन दिला. श्रीलंकेला आरामात 200 धावांचा आत गुंडाळेल असं वाटलं होतं. पण श्रीलंकेच्या शेवटच्या फलंदाजांनी झुंजार खेळी केली. त्यांनी 429 धावांपर्यंत मजल मारली आणि 9 विकेट गमावल्यानंतर डाव घोषित केला. त्यानंतर हा सामना ड्रॉ झाल्याचं घोषित करण्यात आलं.

भारताला अपयश आलं कारण…

  • भारतीय गोलंदाजांना तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात अपयश आलं. श्रीलंकेच्या शेवटच्या दोन तीन जोड्यांनी तब्बल 40हून अधिक षटकांचा यशस्वीरित्या सामना केला. सोनल दिनुशा आणि केशारा नुवांथा ही जोडी सर्वात त्रासदायक ठरली. या जोडीने भारताचा विजय हिरावून घेतला.
  • शुबमन गिलच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. चौथ्या दिवशी झटपट विकेट घेण्याची गरज असताना गिल बचावात्मक भूमिकेत गेल्याची टीका होत आहे. खेळपट्टी संथ असतानाही फलंदाजांवर दडपण आणण्यासाठी आक्रमक फिल्डिंग न लावणे गिलला महागात पडले. त्याचा फटका टीम इंडियाला बसला.
  • भारतीय गोलंदाजांनी अवांतर धावा दिल्या. यात तब्बल 11 नो बॉल टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू आणि धाव महत्त्वाची असते. याचा फटका टीम इंडियाला बसला.
  • पावसाचा व्यत्ययाचा फटकाही भारताला बसला आहे. कारण चौथ्या दिवशी श्रीलंकेने 16 धावांची आघाडी घेतली होती. तसेच 45 मिनिटांचा खेळ शिल्लक होता आणि 6 विकेट पडल्या होत्या. पण पावसामुळे खंड पडला आणि लय तुटली.
Follow Us