गंभीर आणि गिल यांच्यात नेमकं काय सुरू आहे? कोलंबो कसोटीत काय घडलं? गौतमच्या त्या निर्णयाची रंगली चर्चा

कोलंबो कसोटी सामन्यात भारताने मजबूत आघाडी मिळवली होती. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी गणित बिघडलं आणि विजयाचं गणित चुकलं. पहिल्या दोन दिवशी भारताने फलंदाजी केली, पण त्यानंतर श्रीलंकेने तीन दिवस फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं.

गंभीर आणि गिल यांच्यात नेमकं काय सुरू आहे? कोलंबो कसोटीत काय घडलं? गौतमच्या त्या निर्णयाची रंगली चर्चा
गंभीर आणि गिल यांच्यात नेमकं काय सुरू आहे? कोलंबो कसोटीत काय घडलं? गौतमच्या त्या निर्णयाची रंगली चर्चा
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 29, 2026 | 6:09 PM

भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करत मालिका 1-0 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेत 2-0 ने क्लिन स्विप देण्याची संधी होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात गणित चुकलं आणि सामना ड्रॉ झाला. त्यामुळे हाती तोंडी आलेला घास गेल्यानं क्रीडाप्रेमींना प्रचंड वाईट वाटलं आहे. शेवटच्या दिवशी सोनल दिनुषाचं शतक आणि खालच्या स्थानातील फलंदाजांच्या झुंजार भागीदारीमुळे भारताचा विजय हिरावून घेतला. आता या सामन्यात नेमकं काय चुकलं? असा प्रश्न क्रीडाप्रेमी स्वत:ला विचारत आहेत. संघ विजयाच्या वेशीवर असताना सामना ड्रॉ झालाच कसा असा प्रश्न पडला आहे. आता एका रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा करण्यात आला आहे. शुबमन गिलचा डाव घोषित करण्याचा प्रस्ताव प्रशिक्षक गौतम गंभीरने धुडकावून लावला आणि गणित फसलं असं सांगण्यात आलं आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी वेळ मिळाला नाही, असा दावा त्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 503 धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेला 290 धावांवर सर्वबाद करून 214 धावांची आघाडी घेतली. तसेच फॉलोऑन देऊन झटपट विकेटकही घेतल्या. पण सातव्या विकेटपासून टीम इंडियाचं गणित चुकलं आणि पदरी निराशा पडली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डाव घोषित करण्यात टीम इंडियाने उशीर केला, असं काही क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण पावसामुळे सामना थांबला होता आणि ध्रुव जुरेल शतक पूर्ण करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला आणि गणित चुकलं अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. त्यात आता त्या रिपोर्टची भर पडली आहे.

क्रिकब्लॉगरच्या एका रिपोर्टनुसार, कर्णधार शुबमन गिल दुसऱ्या दिवशी टी ब्रेकनंतर डाव घोषित करू इच्छित होता. पण गौतम गंभीरने त्याचं म्हणणं ऐकलं नाही. इतकंच काय तर गंभीरने विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने शतक पूर्ण करावं असं सांगितलं. त्यामुळे डाव खेळण्यासाठी उतरले. इतकंच काय तर या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार दावा केला आहे की, असं पहिल्यांदाच घडलं असं नाही. गौतम गंभीरने यापूर्वीही कर्णधार गिलचं म्हणणं टाळलं आहे. त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात एकमत नसल्याने संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतं आहे.

Follow Us