
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पुढील पाच वर्षांत एकूण 9 स्पर्धांचे आयोजन करेल. या स्पर्धांसाठी यजमान देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि भारताला तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तीन पैकी 2 स्पर्धांचं भारताला संयुक्तपणे आयोजन करायचे आहे. 2026 चा टी20 पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करतील. तसेच 2027 चा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना इंग्लंडमध्ये आयोजित केला जाईल. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही स्पर्धा शेवटची असू शकते. पण मधल्या काळात बरीच गणितं बदलणार आहेत. त्यामुळे तिथपर्यंत हे दोन खेळतील की नाही याबाबत शंका आहे. कारण या स्पर्धेसाठी दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. दुसरीकडे, भारतीय संघ आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी कंबर कसून आहे. मागच्या पर्वात भारताने जेतेपद जिंकलं होतं. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. यासाठी आता सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
2028 चा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आयोजित करतील. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2029 सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 ही स्पर्धा भारतात होणार आहे. भारत एकहाती या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. 2030 चा टी20 विश्वचषक इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड संयुक्तपणे आयोजित करतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2031 फायनलचं आयोजन इंग्लंड क्रिकेट बोर्ड करेल. वनडे वर्ल्ड कप 2031 स्पर्धेचं आयोजन भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे करतील.
पुढील तीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल इंग्लंडमध्ये होतील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मागील तीन आवृत्त्यांचे अंतिम सामने आयोजित केले होते. आता, ईसीबीने पुढील तीन आवृत्त्यांचे आयोजन करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद मिळवले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचा अंतिम सामना भारतात होईल अशी चर्चा होती. मात्र भारताला यजमानपद मिळालं नाही. दुसरीकडे, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानकडे एकाही स्पर्धेचं आयोजन नाही.