
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. हा सामना औपचारिक असणार आहे. कारण नेदरलँडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर भारताने सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे या सामन्याचा निकालाचा गुणतालिकेवर काहीच फरक पडणार नाही. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याचा फरक पडत नसला तर भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासठी प्रयत्नशील असेल. भारताने साखळी फेरीत अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान यांना पराभूत केलं आहे. आता नेदरलँडचं आव्हान असणार आहे. भारत आणि नेदरलँड्स हे संघ फक्त एकदाच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत हे दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा भारताने 56 धावांनी मात दिली होती. हा दोन्ही संघांमधील दुसरा सामना असेल.
अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील मोठ्या मैदानापैकी एक आहे. या ठिकाणी चौकार षटकारांची सीमा थोडी लांब आहे. असं असलं तरी खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे या खेळपट्टी मोठी धावसंख्या उभारता येईल. फिरकीपटूंना थोडी फार मदत मिळू शकते. वेगवान गोलंदाजांनी लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी केली तर फलंदाज अडचणीत येऊ शकतात. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणारा संघ 175 ते 190 धावा करू शकतो. पण दव फॅक्टर पाहता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा स्वीकार केला जाईल. कारण दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं असणार आहे.
सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये उष्ण हवामान राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पावसामुळे खंड वगैरे पडेल असं होणार नाही. हा सामना पूर्ण खेळला जाईल. दिवसाचे तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि रात्री थंड हवामान 23 अंश सेल्सिअसच्या खाली जाईल. तापमान पाहता दुसऱ्या डावात दव पडेल हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरणार आहे.