T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा नेदरलँडविरुद्ध करणार कमाल! तर बुमराहबाबत मोठी अपडेट
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं सुपर 8 फेरीचं गणित सुटलं आहे. त्यामुळे भारतीय संघ साखळी फेरीत नेदरलँडविरुद्ध औपचारिक सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

India vs Netherlands: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना नेदरलँडशी होणार आहे. या सामन्यात तसा काही जोर नाही. पण सुपर 8 फेरीपूर्वी घडी बसवण्यासाठी टीम इंडियाला सराव असणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियात काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्लेइंग 11 मध्ये एखाद दुसरा बदल होऊ शकतो. याबाबत टीम इंडियाचे फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी काही हिंट दिल्या आहेत. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? तसेच अभिषेक शर्माच्या फॉर्मबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. सितांशु कोटक यांनी स्पष्ट सांगितलं की, जसप्रीत बुमराहला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात आराम दिला जाणार नाही. बुमराहाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कमाल गोलंदाजी केली होती. त्याने सुरुवातीच्या दोन षटकात दोन विकेट काढल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आणि पराभवाच्या दरीत ढकलले गेले.
सितांशु कोटक यांनी सांगितलं की, ‘मला वाटत नाही की बुमराह आराम करे. आम्ही या बाबतचा निर्णय नंतर घेऊ.’ तसेच अभिषेक शर्माबाबत त्यांनी स्पष्ट काय ते सांगून टाकलं. त्यांनी सांगितलं की, अभिषेक शर्मा अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आजारी पडला होता. आम्हाला विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करेल. अभिषेक शर्माने त्याचा प्लान तयार केला आहे. अभिषेक शर्मा लवकरच मोठी खेळी करेल. दरम्यान, अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. टी20 क्रिकेटमध्ये अव्वल असलेल्या फलंदाजाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खातंही खोलता आलेलं नाही. अमेरिकेविरुद्ध पहिल्या चेंडूवर आणि पाकिस्तानविरुद्ध 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता. न्यूझीलंड मालिकेपासून आतापर्यंत चार वेळा शून्यावर बाद झाला आहे.
भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशन सध्या फॉर्मात आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे विजयाचं गणित सोपं झालं. इशान किशनच्या फलंदाजीवर सितांशु कोटक यांनी स्तुतीसुमनं उधळली. त्यांनी सांगितलं की, इशान किशनकडे आत्मविश्वा, आहे. त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याची विचार करण्याची पद्धत टी20 क्रिकेटमध्ये कामी येत आहे.
