T20 World Cup 2026: भारताचा सामना झिम्बाब्वे की श्रीलंकेशी! सुपर 8 फेरीपूर्वी ट्विस्ट
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सुपर 8 फेरीतील 7 संघ ठरले असून एका संघासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे, सुपर 8 फेरीत भारताचा सामना श्रीलंका की झिम्बाब्वेशी होणार? याबाबत ट्वीस्ट आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. तसेच सुपर 8 फेरीतील सात संघही ठरले आहे. भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका हे संघ सुपर 8 फेरीत पोहोचले आहे. तर एका संघासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस आहे. पाकिस्तान नामिबिया सामन्यानंतर यापैकी एका संघाचा निकाल लागेल. पण त्या आधीच सुपर 8 फेरीतील संघांचं दोन गटात वर्गीकरण झालं आहे. सुपर 8 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये झिम्बाब्वे, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत हे संघ आहेत. तर ग्रुप 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहे. या गटात पाकिस्तान किंवा अमेरिकेची एन्ट्री होईल. पण या गटात एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. गट ब मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा सामना व्हायचा आहे. तसेच या सामन्यानंतर या गटात उलथापालथ होऊ शकते. मात्र असं असतानाही भारत असलेल्या गटात झिम्बाब्वेला स्थान मिळालं आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 ग्रुप 1 मध्ये अ, क आणि ड गटातील टॉप संघ आहेत. यात भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. पण ब गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या झिम्बाब्वेला या गटात स्थान दिलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात शेवटचा साखळी फेरीतील सामना व्हायचा आहे. हा सामना जिंकणारा संघ टॉपला राहील. त्यामुळे टॉपला असणारा संघच या गटात असायला हवा होता. मग असं काय झालं की श्रीलंका संघ टॉपला असला तरी झिम्बाब्वेच या गटात खेळणार आहे. चला जाणून घेऊयात
भारताच्या गटात झिम्बाब्वे का?
स्पर्धेपूर्वीच आयसीसीने क्रमवारीच्या आधारावर सुपर 8 फेरीतील संघांचे स्थान ठरवले होते. या संघांना सुपर 8 टप्प्यात पूर्वनिर्धारित स्थान देण्यात आले होते, त्यामुळे गटात कोणतंही स्थान मिळवलं असतं तर त्या क्रमवारीच्या आधारावरच विभागणी होणार होती. यात ग्रुप 1 मध्ये भारताला स्थान दिलं होतं. तर ग्रुप 2 मध्ये श्रीलंका असणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात लढणार हे आधीच स्पष्ट होतं. झिम्बाब्वेच्या जागी जर ऑस्ट्रेलिया संघ पात्र ठरला असता तर भारताच्या गटात असता. कारण एखाद्या क्रमावारीतील संघाची जागा बिगर सीडेड संघाने घेतली तर तो त्या संघाची जागा घेईल, असं ठरलं होतं.
