IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

| Updated on: Mar 11, 2022 | 1:23 PM

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचं (Kuldeep Yadav) टॅलेंट सगळ्यांनाच माहित आहे. त्याचा फॉर्म पहिल्यासारखा नाहीय. पण जो पर्यंत तुम्ही एखाद्या खेळाडूला बेंचवर बसवून ठेवाल, तर तो फॉर्ममध्ये कसा येईल?

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर
IND vs SL: जसप्रीत बुमराहने सांगितलं कुलदीप यादवला बाहेर करण्यामागचं कारण
Image Credit source: Bcci/Twitter
Follow us on

मुंबई: चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचं (Kuldeep Yadav) टॅलेंट सगळ्यांनाच माहित आहे. त्याचा फॉर्म पहिल्यासारखा नाहीय. पण जो पर्यंत तुम्ही एखाद्या खेळाडूला बेंचवर बसवून ठेवाल, तर तो फॉर्ममध्ये कसा येईल? कुलदीप यादवला पुरेशी संधी मिळाली नाही. सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी दिल्याशिवाय बाहेर करण्यात आलं. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कुलदीप यादवला बाहेर करण्यामागचं कारण सांगितलं आहे. बुमराहने दिलेलं उत्तर खूपच अजब आहे. बंगळुरु कसोटीआधी (IND VS SL) पत्रकार परिषद झाली. त्यात त्याने सांगितलं की, कुलदीप यादव बऱ्याचकाळापासून बायोबबलमध्ये आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी रिलीज करण्यात आलं आहे.

कुलदीप यादव मोहाली कसोटीत टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला बेंचवर बसवून ठेवण्यात आलं. अश्विन, जाडेजाशिवाय जयंत यादवला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळवण्यात आलं. बंगळुरु कसोटीआधी त्याला स्क्वाडमधूनच बाहेर करण्यात आलं. त्याच्याजागी अक्षर पटेलने संघात पुनरागमन केलं आहे.

वाचा जसप्रीत बुमराहचं उत्तर

“कुलदीप यादव बऱ्याच काळापासून बायो बबलमध्ये आहे. आयपीएलआधी त्याला कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, म्हणून रिलीज केलं आहे. बायो बबलमध्ये रहाण इतकं सोपं नाहीय. त्याच्या चांगल्यासाठी हा निर्णय घेतला आहे” कुलदीप यादवला बाहेर करण्यासाठी जसप्रीत बुमराहने जे उत्तर दिलय, त्याला खरोखरच अर्थ नाही. कुलदीप यादवला वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आले होते. तो तिन्ही फॉर्मेटमध्ये संघाचा भाग होता. पण त्याला फक्त दोन सामने खेळवण्यात आले. वेस्ट इंडिज आणि श्रीलंके विरुद्ध प्रत्येकी एका सामन्यात खेळवण्यात आलं.

कुलदीप यादवला जास्तीत जास्त टीममध्ये खेळवलं असतं, तर त्याला विश्रांती देण्याचा मुद्दा समजू शकला असता. त्याला जास्तीत जास्त संधी मिळणं आवश्यक होतं. बराच काळ संघाबाहेर असल्याने त्याच्याही आत्मविश्वासावर परिणाम झालाय. सध्या संघात रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे दोन फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळेच कुलदीप यादवला संघाबाहेर करण्यात आलं असावं.