IND vs SL : टीम इंडिया एक दोन नाही तर 28 चुका पडणार महागात, श्रीलंका दौऱ्यात तसंच झालं तर…
भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. पण मागच्या 28 चुका पाहता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया कसून सराव करत आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठायची तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. पण मागच्या तीन महिन्यातील चुका पाहता क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. यामुळे श्रीलंका कसोटी मालिका कठीण जाण्याची शक्यता आहे. या चुका दुसऱ्या तिसऱ्या काही नसून गचाळ क्षेत्ररक्षणासंदर्भातल्या आहे. भारताने मागच्या तीन महिन्यात झेल सोडण्याचा नकोसा विक्रम केला आहे. कॅचेस ड्रॉप लॉसेस मॅच या उक्तीप्रमाणे भारताला मागच्या काही मालिकांमध्ये फटका बसला आहे. मागच्या सहा सामन्यांपासून सलग चुका करत आहे. याचा फटका टीम इंडियाला पराभवातून चुकवावा लागू शकतो.
टीम इंडियाचा झेल सोडण्याची जणू सवयच..
टीम इंडियाने गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये गचाळ क्षेत्ररक्षणाचं भव्य प्रदर्शन मांडलं आहे. मागच्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता असंच म्हणावं लागेल. जून महिन्यापासून भारताने 6 मालिका खेळल्या आणि यात 28 झेल सोडले आहेत. यावरून टीम इंडियाचं क्षेत्ररक्षणात मन रमत नसल्याचं दिसून येत आहे. अफगाणिस्तान कसोटी सामन्यात 4 झेल, अफगाणिस्तान वनडे मालिकेत 1 झेल, आयर्लंड टी20 मालिकेत 6 झेल, इंग्लंड टी20 मालिकेत 5 झेल, इंग्लंड वनडे मालिकेत 2 झेल आणि झिम्बाब्वे टी20 मालिकेत 10 झेल सोडले आहेत.
टीम इंडियाचं फिटनेस काय कामाचं?
झिम्बाब्वेमध्ये टीम इंडियाची झेल पकडण्याची क्षमता टक्केवारीत फक्त 64.2 टक्के आहे. टीम इंडियाने 18 झेल पकडले, पण 10 झेल सोडले त्याचं काय? दुसरीकडे, झिम्बाब्वेने 12 झेल पकडले आणि एकच सोडला. म्हणजे भारतापेक्षा क्षेत्ररक्षणात झिम्बाब्वे सरस आहे. मग प्रश्न असा पडतो की टीम इंडिया फिटनेसवर इतकं लक्ष केंद्रित करते मग झेल का सुटतात? झेल सोडल्यामुळे भारताने आयर्लंड टी20 मालिका गमावली. झेल सोडण्याचा फटका इंग्लंड वनडे आणि टी20 मालिकेतही बसला. आता श्रीलंकेत असं काही घडलं तर जिंकणं कठीण होईल.
