MI vs DC : मागच्या पर्वात सलग जिंकल्यानंतर खंड पडला, आता धडा घेत कर्णधार अक्षर पटेल म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वरचष्मा दिसला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. या विजयानंतर कर्णधार अक्षर पटेलने आपलं मनोगत व्यक्त केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून नमवलं. यासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सने अशीच सुरूवात केली होती. सुरूवातीचे सामने धडाधड जिंकले होते. मात्र त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून उतरली आणि प्ले ऑफमध्ये जागाही मिळवता आली नाही. मागच्या अनुभवातून दिल्ली कॅपिटल्स बरंच काही शिकल्याचं कर्णधार अक्षर पटेलने सांगितलं. मागच्या पर्वातून काय अनुभव मिळाला याबाबत त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर सांगितलं.
काय म्हणाला अक्षर पटेल?
मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारल्यानंतर अक्षर पटेल म्हणाला की, ‘मला वाटते की एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही सतत जिंकत असता, तेव्हा ती गती कायम ठेवणे महत्त्वाचे असते. कारण जेव्हा कधी खेळात खंड पडतो आणि लय थांबते, तेव्हा आयपीएलसारख्या दीर्घ स्पर्धेत पुनरागमन करणे कठीण होऊन बसते. त्यामुळे तुम्ही एका सामन्यावर लक्ष केंद्रित करता. त्यात चांगली कामगिरी करता आणि मग भूतकाळाचा फारसा विचार न करता पुढे जाता. मला असेच वाटते की, यावेळी आमची सुरुवात चांगली झाली आहे आणि आम्ही गेल्या वर्षीच्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही.’
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?
नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी निवडली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 162 धावा केल्या. तसेच विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो समीर रिझवी. या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरला होता. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकार मारत 90 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे विजय सोपा झाला. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी 8 एप्रिल रोजी होणार आहे.