IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने कर्णधार बदलला, यशस्वी जयस्वालकडे जबाबदारी; कारण की…
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कर्णधारपदाची धुरा यशस्वी जयस्वालकडे सोपवली आहे. त्याचं कारण असं की...

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या टप्प्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कर्णधार बदलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल मैदानात आला होता. त्यामुळे असं काय झालं असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. पहिल्याच फटक्यात त्याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि त्याने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. तसं पाहिलं तर कर्णधारपदाचा अनुभव नसल्याने यशस्वी जयस्वाल बोलताना जरा गांगारल्यासारखा वाटला. पण त्याने या सामन्यात रियान पराग का खेळत नाही याचं कारण सांगितलं.
कर्णधार यशस्वी जयस्वाल याने सांगितलं की, रियान परागला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात खेळत नाही. मागच्या सामन्यात रियान परागला दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्याला मुकला आहे. आता प्लेइंग 11 मध्ये कधी परतेल हे मात्र सांगणं कठीण आहे. रियान पराग नसल्याने प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. प्लेइंग 11 मध्ये शिमरोन हेटमायर आणि पुलकेशिया पुनिया यांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने संघात एक बदल केला आहे. मानव सुथारच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे.
रियान परागचा खराब फॉर्म
आयपीएल 2026 स्पर्धेत रियान परागची सुमार कामगिरी दिसून आली आहे. एका सामन्यात चांगली फलंदाजी केली. पण इतर सामन्यात फार काही करू शकला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात त्याने 23 च्या सरासरीने 207 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याच्या फॉर्ममुळे राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान, आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्सने ट्रेड डीलमधून रवींद्र जडेजाला संघात घेतलं आणि संजू सॅमसनला सोडलं होतं. त्यामुळे कर्णधारपदाची माळ रियान परागच्या गळ्यात पडली होती. मागच्या पर्वातही संजू सॅमसन जखमी असताना रियान परागने धुरा सांभाळली होती.