Manav Suthar: मानव सुथारच्या हाती असं काय की त्यामुळे फिरकीत ठरतो खास! जाणून घ्या
पहिल्या कसोटी सामन्यात मानव सुथारच्या फिरकीवर श्रीलंकन फलंदाज नाचले. त्याने दोन्ही डावात मिळून 10 विकेट काढल्या. मानव सुथारमधील गोलंदाजीतील एक गुण श्रीलंकन फलंदाजांना संभ्रमात टाकण्यात भारी पडला. त्याच्या मनगटातील जादू श्रीलंकन फलंदाजांना कळलीच नाही.

भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघातून मोलाचं योगदान दिलं ते फिरकीपटू मानव सुथारने… त्याने दोन्ही डावात मिळून 10 विकेट काढल्या आणि काही विक्रम आपल्या नावावर केले. सुथारने आपल्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. त्याच्या गोलंदाजीची शैली काही श्रीलंकन फलंदाजांना शेवटपर्यंत कळू शकली नाही. त्याच्या चेंडूचा सामना करताना श्रीलंकन फलंदाजांच्या डोक्यात संभ्रम कायम असायचा. कारण एकाच शैलीत दोन प्रकारे चेंडू टाकण्याची त्याची असणारी कला.. त्याच्या या शैलीमुळे त्याचे प्रशिक्षक धीरज शर्मा खूपच खूश आहे. खासकरून सरळ जाणाऱ्या चेंडूमुळे त्यांना आनंद वाटला. कारण त्याने तीन विकेट या सरळ जाणाऱ्या चेंडूवर घेतल्या. सुथार या चेंडूसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून काम करत होता. त्यात त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळताना पाहून आनंद होणं सहाजिकच आहे.
मानव सुथारच्या शैलीची काय खासियत?
मानव सुथारने ज्या शैलीत चेंडू टर्न करतो, त्या शैलीतच चेंडू सरळ टाकण्याच सराव केला. यासाठी त्याला प्रशिक्षक धीरज शर्मा यांची मदत झाली. धीरज शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘मला खूप आनंद आहे की मानवला तीन विकेट सरळ टाकलेल्या चेंडूवर मिळाल्या.’ धीरज शर्मा म्हणाले की, मानवला आधीच सल्ला दिला आहे की फलंदाजांना जास्तीत जास्त चेंडू खेळवण्याचा प्रयत्न कर. स्टम्पवर अटॅक कर, त्यामुळे विकेट मिळण्याची शक्यता अधिक असते. गॉलची खेळपट्टी संथ असल्याने सुथारने अटॅक करण्याचा प्लान केला होता. त्यात त्याला यशही मिळालं.
मानव सुथारचे हात लांबलचक आहेत. त्यात त्याची हाती बोटही मजबूत असल्याने चेंडू नियंत्रणात ठेवू शकतो. इतकंच काय तर चेंडू वळवण्यातही माहिर आहे. खरं तर मानव सुथार फलंदाज व्हावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार होते. पण प्रशिक्षक धीरज शर्मा यांना त्यांना तसं करण्यास नकार दिला. प्रशिक्षकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की, मानव फलंदाज होऊ शकत नाही. त्याच्या मनगटात जादू आहे आणि चांगला गोलंदाज होऊ शकतो. आज ही गोष्ट सत्यात उतरताना दिसत आहे. कारण त्याने 2 कसोटीत 17 विकेट काढल्या.
