MI vs SRH : पराभवानंतर सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि म्हणाला, ” यातून स्पष्ट असं दिसतंय की…”

| Updated on: Mar 28, 2024 | 3:57 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. दुसरा पराभव हा मोठ्या फरकाने झाल्याने धक्का बसला आहे. कारण त्याचा थेट गुणतालिकेवर प्रभाव पडला असून त्यातून पुढे जाऊन सावरणं खूप कठीण होणार आहे. असं सर्व चित्र असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सच्याा ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना कानमंत्र दिला आहे.

MI vs SRH : पराभवानंतर सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि म्हणाला,  यातून स्पष्ट असं दिसतंय की...
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफची वाट सुरुवातीपासूनच बिकट होताना दिसत आहे. कारण दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला मोठ्या फरकाने पराभूत केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान गाठताना 20 षटकात 5 गडी गमवून 246 धावांपर्यंत मजल मारली. मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सने बऱ्यापैकी झुंज दिली असली तरी टी20 मध्ये 31 धावांनी पराभव होणं हे रनरेटवर प्रभाव टाकणारं असतं. असं सर्व चित्र असताना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि मेंटॉर सचिन तेंडुलकरला राहावलं नाही. त्याने थेट ड्रेसिंग रुम गाठलं आणि खेळाडूंना कानमंत्र दिला.

“सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 277 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स पहिल्या 10 षटकात चांगली कामगिरी केली. त्यामुळे तेव्हा कोण जिंकेल? हे सांगणं कठीण होतं. विजयाचं पारडं कोणच्याही बाजूने झुकणारं होतं. दिलेलं आव्हान गाठणं शक्य होईल असं दिसत होतं. यातून सरळ स्पष्ट दिसतं की फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकत्र या, घट्ट पाय रोवा. पुढे जाऊन आणखी कठीण प्रसंग येतील. पण आपल्याला एकत्रितपणे त्याचा सामना करायचा आहे.”, असा कानमंत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर कर्णधार हार्दिक पांड्यानेही संघाचं मनोबळ वाढवलं. “सैनिकांना कठोर परीक्षेतून जावं लागतं. आपण या स्पर्धेतील एक कणखर संघ आहोत. मुंबई इंडियन्स म्हणून आपण जिथपर्यंत पोहोचलो तिथर्यंत कोणीही पोहोचू शकलेलं नाही. या गोष्टीचा मला अभिमान आहे. दिवस विपरीत असताना गोलंदाजांनी कुठेच पळ काढला नाही. प्रत्येकाने गोलंदाजी करण्याचं सामर्थ्य दाखवलं. हे चांगलं लक्षण आहे. काहीही झालं तरी एकमेकांच्या मदतीला उभं राहुया. जे काही चांगलं वाईट होईल त्याचा सामना एकत्रितपणे करू.”, असं कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं.

आयपीएल गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ दोन पराभवासह नवव्या स्थानावर आहे. रनरेट -0.925 इतका आहे. त्यामुळे पुढच्या 12 सामन्यात रनरेट सुधारण्यासोबत विजयी वाटचाल कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. अन्यथा साखळी फेरीच्या शेवटी जर तरच्या गणितात रनरेटमुळे मुंबई इंडियन्सचं स्वप्न भंगू शकते. त्यामुळे आता रनरेटची ही पोकळी पुढच्या सामन्यात भरून काढावी लागेल.