एमपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं! एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी संघ मालकांचं केलं कौतुक
आयपीएल 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना मध्य प्रदेश क्रिकेट लीग स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. यंदा स्पर्धेचं तिसरं पर्व आहे. या स्पर्धेपूर्वी एपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी जनकल्याण कामांचा उल्लेख करत कौतुक केलं.

मध्य प्रदेश क्रिकेट लीग स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 3 जूनपासून स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व 15 संघांच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. यात 10 पुरूष आणि पाच महिला संघाचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया भोपाळला आले होते. त्यांनी यावेळी त्यांनी स्पर्धेतील संघ मालकांचं कौतुक केलं. खेळाडूंना सातत्याने उत्तम सुविधा पुरवल्याबद्दल आभार व्यक्त केले. इतकंच काय तर खेळाडू शोधण्यासाठी राज्यभरात शिबिरे आयोजित करणे, त्यांची योग्य निवड करणे आणि उर्वरित निवडलेल्या खेळाडूंसाठी पुरेसा सहाय्यक कर्मचारी वर्ग आणि प्रशिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशंसा केली.
एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया म्हणाले की, “एमपीएल 2026 हे एक उत्तम व्यासपीठ आहे. हो, सध्या वातावरण थोडे तापलेले आहे, पण तुम्हा सर्वांना तुमचे 200 टक्के द्यावे लागतील. खेळाडू शोधण्यासाठी अनेक अधिकारी सामने पाहायला येतात. त्यामुळे सामन्यातील एक गोलंदाजी, एक चांगले षटक आणि एक उत्कृष्ट फलंदाजी तुमच्यासाठी आयपीएल आणि भारतीय संघात निवडीचे दरवाजे उघडेल.” एमपीएल जनकल्याणाला प्रोत्साहन देत आहे, असं सांगत महान आर्यमन सिंधिया यांनी संघ मालकांचं कौतुकही केलं.
महानआर्यमन सिंधिया यांनी पुढे सांगितलं की, गेल्या वर्षी मध्य प्रदेश लीगमधील अनेक संघांच्या मालकांनी जनहितार्थ निर्णय घेतले होते. यात रेवा जग्वार्सने प्रत्येक डॉट बॉलसाठी एक झाड लावण्याची घोषणा केली होती आणि जबलपूर लायन्सने प्रत्येक 100 धावांसाठी एका गरजू तरुण खेळाडूला क्रिकेट किट दान करण्याची घोषणा केली होती. आता 2026 मध्ये, रॉयल नेमार वॉरियर्स संघाचे मालक सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी जर्सी लॉन्चप्रसंगी अनेक घोषणा केल्या आहेत.
- मुलींसाठी AISECT इंडिया एमपीएल शिष्यवृत्ती : या योजनेअंतर्गत, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. यावर्षी, मध्य प्रदेशातील मुलींना प्रत्येक सामन्यात केलेल्या 100 धावांच्या संख्येइतकी शिष्यवृत्ती मिळेल. उदाहरणार्थ, जर एका सामन्यात दोन्ही संघांची एकूण धावसंख्या 300 पेक्षा जास्त झाली, तर तीन मुलींना शिष्यवृत्ती मिळेल.
- रॉयल निमार ईगल क्रिकेट किट दान मोहीम: निमार प्रदेशातील सरकारी शाळा आणि इतर लहान शाळांमधील गरजू मुलांना क्रिकेट किट प्रदान केले जातील.