रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरुद्ध मुंबईचा निसटता विजय, एकट्या खेळाडूने वाचवली लाज

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेचं पर्व सुरु झालं असून प्रत्येक संघ आपला पहिला सामना खेळत आहे. पहिल्याच सामन्यात मुंबईचा सामना जम्मू काश्मीरशी झाला. या सामन्यात मुंबईने 35 धावांनी विजय मिळवला. एका खेळाडूच्या कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरुद्ध मुंबईचा निसटता विजय, एकट्या खेळाडूने वाचवली लाज
रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरुद्ध मुंबईचा निसटता विजय, एकट्या खेळाडूने वाचवली लाज
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 18, 2025 | 7:04 PM

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा दबदबा राहीला आहे. आतापर्यंत मुंबईने 41वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. यामुळे मुंबईच्या संघाच्या दादागिरी दिसून येत आहे. पण रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबईला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. मुंबईने पहिल्या डावात 386 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात जम्मू काश्मीरच्या संघाने 325 धावा केल्या. मुंबईकडे पहिल्या डावात 61 धावांची आघाडी होती. मुंबईने दुसऱ्या डावात 181 धावांची खेळी केली. यासह मुंबईने एकूण 242 धावा केल्या आणि विजयासाठी 243 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरचा संघ 207 धावांवर बाद झाला. या सामन्यात मुंबईने फक्त 35 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो शम्स मुलानी… त्यामुळे मुंबई विजयात फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान दिलं. त्यासाठीच त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

दुसऱ्या डावात काय झालं?

विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या जम्मू काश्मीरला रोखण्यासाठी मुंबईला झटपट विकेट घेणं भाग होते. डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी याने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. मुलानीने 20.4 षटकं टाकत जम्मू काश्मीरच्या सात फलंदाजांना बाद केलं. जम्मू काश्मीरचा संपूर्ण संघ अवघ्या 207 धावांवर बाद झाला. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबईचं पराभवाच्या छायेतून सुटका झाली. इतकंच काय तर त्याने दोन्ही डावात चांगली फलंदाीज केली. दिग्गज फलंदाज फेल गेल्यानंतर त्याने एका बाजूने डाव सावरला. पहिल्या डावात त्याने 91 धावांची खेळी केली होती. तर सिद्धेश लाडसोबत 159 धावांची भागीदारी केली. तर दुसऱ्या डावात मुंबईसाठी सर्वाधिक 41 धावा केल्या.

28 वर्षीय शम्स मुलानी याने दोन्ही डावात मिळून 132 धावा काढल्या. पहिल्या डावात दोन विकेट काढल्या होत्या. त्यामुळे एकूण 9 विकेट त्याच्या नावावर झाल्या. शम्स मुलानीने 17व्यांदा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाचहून अधिक विकेट काढल्या आहे. तसेच जम्मू काश्मीरविरुद्ध घेतलेल्या 7 विकेट त्याच्या कारकिर्दीतील बेस्ट कामगिरी ठरली आहे. शम्स मुलानी अजूनही टीम इंडियात खेळण्याची प्रतिक्षा आहे. अष्टपैलू कामगिरी पाहता त्याचा विचार कसोटी संघात केला जाऊ शकतो. आता पुढच्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे निवडकर्त्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us