Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलं
आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. पण त्याच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक ट्रेवर पेनी यांनी त्यावर मोठं विधान केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या समोर दिग्गज गोलंदाज आले पण त्याने कोणालाही सोडलं नाही. त्याने या स्पर्धेत शतकही ठोकलं. त्यामुळे त्याची धास्ती भल्याभल्या गोलंदाजांनी घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याच्या फलंदाजीचं कौतुक केलं जात असताना दुसरीकडे त्याच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि संजय मांजरेकर यांनी वैभव सूर्यवंशीच्या फिल्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याचा या पर्वात एक इम्पॅक्ट म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे त्याला फिल्डिंगची हवी तशी संधी मिळत नाही. त्याने काही सामन्यात फिल्डिंग केली पण त्यातही त्याने गचाळ क्षेत्ररक्षण केल्याने टीकाकारांच्या रडारवर आला आहे. आता या प्रकरणावर राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक ट्रेवर पेनी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक ट्रेवर पेनी यांनी या स्पर्धेच्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी सांगितलं की, ‘तो खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. तो चांगल्या प्रकारे मुव्हमेंट करतो. त्याला चेंडू कोणत्या दिशेला जात आहे याचा अंदाज आहे आणि तिथे बरोबर उडी मारतो. तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळतो त्याच्या क्षेत्ररक्षणाशी काही संबंध नाही. ही फक्त स्थिती आहे. ‘ दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा या लीग स्पर्धेतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना करो या मरोची स्थितीवाला आहे. या सामन्यात पराभूत झाले तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेतील 13 सामन्यात 44.53 च्या सरसारीने 579 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या धावा त्याने 236.32 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि प्लेऑफमधील राजस्थान रॉयल्सचं स्थान पक्कं झालं. तर त्याच्याकडे ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे.