Ranji Trophy 2022: मुंबई विरुद्ध चेतेश्वर पुजाराचा फ्लॉप शो, चार चेंडूत खेळ खल्लास, टेस्ट करीयर संकटात

| Updated on: Feb 19, 2022 | 1:28 PM

Ranji Trophy 2022: देशात रणजी सीजन (Ranji season) सुरु झाला आहे. वेगवेगळ्या संघांमध्ये आंतरराज्य सामने सुरु आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि सौराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या सामन्यावर सगळ्या मीडियाचे लक्ष आहे.

Ranji Trophy 2022: मुंबई विरुद्ध चेतेश्वर पुजाराचा फ्लॉप शो, चार चेंडूत खेळ खल्लास, टेस्ट करीयर संकटात
कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा अजून व्हायची आहे. संघातील काही सिनियर खेळाडूंच स्थानही धोक्यात आलं आहे.
Follow us on

अहमदाबाद: देशात रणजी सीजन (Ranji season) सुरु झाला आहे. वेगवेगळ्या संघांमध्ये आंतरराज्य सामने सुरु आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि सौराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या सामन्यावर सगळ्या मीडियाचे लक्ष आहे. कारण मुंबईकडून अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) तर सौराष्ट्राकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) हा सामना खेळतोय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील निराशाजनक प्रदर्शनामुळे दोघांना संघातून डच्चू देण्याची मागणी होत आहे. अजिंक्य रहाणेने पहिल्याच दिवशी शतकी खेळी साकारली. अजिंक्यने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याने दावेदारी सांगितली आहे. पण चेतेश्वर पुजाराला अजिंक्य रहाणेसारखा खेळ दाखवता आला नाही. चेतेश्वर पुजारा अजूनही फॉर्मसाठी चाचपडतोय. मुंबई विरुद्धच्या सामन्यात अवघ्या चार चेंडूत पुजाराचा खेळ संपला. चेतेश्वर पुजारा मुंबई विरुद्ध खातही उघडू शकला नाही. तो शुन्यावर आऊट झाला. मुंबईचा गोलंदाज मोहित अवस्थीने पुजाराला पायचीत पकडलं.

रणजी खेळणाऱ्या अन्य क्रिकेटपटूंच्या तुलनेत रहाणे आणि पुजारावर जास्त दबाव आहे. कारण त्यांचं कसोटी करीयर संकटात आहे. आगामी श्रीलंके विरुद्धच्या मालिकेसाठी त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोघांना रणजी खेळण्याचा सल्ला दिला होता. आजच्या फ्लॉप शो नंतर चेतेश्वर पुजारावरील दबाव आणखी वाढला असेल.

सौराष्ट्र विरुद्ध मुंबईने आपला पहिला डाव सात बाद 544 वर घोषित केला. सौराष्ट्राच्या पहिल्या डावाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली आहे. सौराष्ट्राच्या अन्य फलंदाजांनी खात तरी उघडलं, पण पुजारा तिथे अपयशी ठरला. सौराष्ट्राचे पहिले पाच फलंदाज 75 धावात तंबूत परतले आहेत. मोहित अवस्थीने तीन तर शम्स मुलानीने दोन विकेट घेतल्या.