ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, टीम इंडियातील पुनरागमनचा प्लान ठरला

विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याचं नाव नाही. पण टीम इंडियात पुनरागमनासाठी प्लान ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, टीम इंडियातील पुनरागमनचा प्लान ठरला
ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, टीम इंडियातील पुनरागमनचा प्लान ठरला
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2025 | 9:16 PM

भारताची स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. मँचेस्टरमध्ये खेळलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा चेंडू थेट त्याच्या पायाच्या अंगठ्यावर लागला होता. त्यामुळे फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शेवटची कसोटी मालिका खेळू शकला नव्हता. तेव्हापासून ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आशिया कप स्पर्धेला मुकला. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही स्थान मिळालं नाही. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेतही खेळू शकणार नाही. त्यामुळे आता ऋषभ पंत पुन्हा मैदानात कधी परतणार याची चिंता त्याच्या चाहत्यांना आहे. असं असताना ऋषभ पंत दुखापतीतून सावरत असून मैदानात परतण्याची तयारी सुरु केली आहे.

रिपोर्टनुसार, तीन महिने दुखापतीवर मात करत आता रणजी ट्रॉफीतून मैदानात परतण्याची तयारी सुरु केली आहे. ऋषभ पंतने दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला 25 ऑक्टोबरपासून दिल्लीत होणाऱ्या सामन्यात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यासाठी बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून फिटनेस क्लियरेंस मिळणं आवश्यक आहे. जर सर्व काही ठीक असेल तर ऋषभ पंत दिल्ली संघाची धुरा सांभाळू शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयची वैद्यकीय टीम लवकरच सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये पंतच्या उजव्या पायाची तपासणी करेल. बीसीसीआय ऋषभ पंतबाबत कोणतीही जोखिम पत्कारण्यास तयार नाही. त्यामुळे दिल्ली संघाकडून मैदानात परतेल की नाही हे सांगणं कठीण आहे.

रणजी स्पर्धेचा पहिला टप्पा 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या टप्प्यात ऋषभ पंतचं खेळणं खूपच कठीण आहे. दुसरीकडे, नोव्हेंबर महिन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका आहे. ही कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. जर पंत दुखापतीतून सावरला असेल तर त्याला रणजी ट्रॉफीनंतर थेट टीम इंडियात स्थान मिळू शकते. सध्या त्याच्या जागी संघात ध्रुव जुरेल खेळत आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी करून आपला दावा पक्का केला आहे. त्यामुळे ऋषभ पंतसाठी संघात परतणं कठीण आव्हान असणार आहे.