पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला, सचिन कशाला समजला अणूबॉम्बचं बटन?; 22 वर्षानंतर मोठा खुलासा

2004 मधील भारत-पाकिस्तान क्रिकेट दौऱ्यात टीम इंडियावर हल्ल्याचा धोका होता. यशोवर्धन आझाद यांच्या पुस्तकात 22 वर्षांनी याचा गौप्यस्फोट झाला आहे. तत्कालीन उपपंतप्रधान आडवाणींनी कराचीमध्ये सुरक्षा धोक्यांमुळे कसोटी खेळण्यास नकार दिला होता, जी मुशर्रफ यांची विनंती होती. यात सचिन तेंडुलकरने एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या जॅमरला चुकून 'अणूबॉम्बचे बटण' समजल्याचा मजेदार किस्साही आहे.

पाकिस्तानात टीम इंडियावर होणार होता हल्ला, सचिन कशाला समजला अणूबॉम्बचं बटन?; 22 वर्षानंतर मोठा खुलासा
2004 Pakistan Tour Security
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 11:32 AM

भारत आणि पाकिस्तानने बऱ्याच काळापासून बायलेटरल सीरीज खेळलेली नाहीये. दोन दशकापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्या देशामध्ये क्रिकेट खेळायचे. 2004मध्ये भारताचा पाकिस्तानमध्ये एक दौरा झाला होता. भारताच्या या ऐतिहासिक दौऱ्यापूर्वी तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना कराची टेस्टसाठी यजमान व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी भारताची परवानगी मागितली होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्याला परवानगी मिळाली नव्हती. आता भारताच्या दौऱ्यावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 22 वर्षानंतर मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

माजी गुप्तचर आणि सुरक्षा अधिकारी यशोवर्धन आजाद यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. ‘पुलिसिंग द रिपब्लिक: एन इनसाइड व्ह्यू ऑफ हाउ इंडिया फाइट्स करप्शन अँड क्राइम, अँड प्रोटेक्ट्स राइट्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात हा संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला आहे. या पुस्तकात या 22 वर्षापूर्वीच्या दौऱ्याची माहितीही त्यात देण्यात आली आहे. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांननी या संपूर्ण प्रकरमआत महत्त्वाची भूमिका बजावत मुशर्रफ यांची विनंती नाकारली होती.

तीन सदस्यी समितीची पाहणी

पाकिस्तानच्या सर्व क्रिकेट स्थळांच्या सुरक्षा ठिकाणांचा तपास करणाऱ्या तीन सदस्यी सुरक्षा दलाचे आजाद हे प्रमुख होते. या सुरक्षा दलाने मॅच खेळण्यास परवानगी दिली. पण कराची आणि पेशावरमध्ये टेस्ट मॅच न खेळण्याचा सल्ला दिला. सुरक्षा दलाने मुलतान, रावळपिंडी आणि लाहोर टेस्ट मॅचसाठी सुरक्षित असल्याचं सांगितलं. रिपोर्ट दिल्यानंतर काही वेळाने आजाद यांना ‘रिस्ट्रिक्टेड एरिया एक्सचेंज (आरएएक्स)’ वर आडवाणी यांचा फोन आला. आडवाणी म्हणाले, यशोवर्धनजी, कराचीमध्ये आपण टेस्ट मॅच नाही खेळू शकत का?

पेशावर आणि कराची यादीतून बाहेर

यावेळी आजाद यांनी आडवाणी यांना कराची आणि पेशावरला टेस्ट सूचीच्या बाहेर का ठेवलं याची माहिती त्यांनी दिली. या दोन्ही ठिकाणी धोक्याची शक्यता अधिक आहे. या ठिकाणी टीम अधिक काळ राहिल्यास धोका अधिक वाढू शकतो, असं त्यांनी सांगितलं. त्यावर आडवाणी यांनी सुरक्षेच्या निष्कर्षावर पुन्हा विचार करण्याचा आणि हे प्रकरण आयबीच्या संचालकासमोर ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच आयबीच्या संचालकांशी या विषयावर बोलण्यासही सांगितल्याचं आजाद यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

एप्रिलपर्यंत सामने

भारताचा पाकिस्तान दौरा मार्चमध्ये सुरू झाला. कराचीत वनडे सामना सुरू झाला आणि एप्रिलपर्यंत हे सामने खेळवले गेले. कराचीत होणाऱ्या टेस्टच्या सुरक्षेवरून आजाद चिंतीत होते. त्यांनी आपला शालेय मित्र अरुण सिंह यांना फोन केला. अरुण सिंह त्यावेळी परराष्ट्र खात्यात पकिस्तानशी संबंधित प्रकरणाचे संयुक्त सचिव होते. त्यावेळी कराचीत टेस्ट खेळण्याची विनंती स्वत: मुशर्रफ यांनी केल्याचं सिंह यांनी आजाद यांना सांगितलं.

त्यावर आजाद यांनी हा सवाल उपपंतप्रधानांकडून का आला? असा सवाल केला. त्यावर सिंह म्हणाले, मुशर्रफ यांनी विनंती केली. तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांच्या माध्यमातून हा निरोप आला. याच पुस्तकात आजाद पुढे म्हणतात, आडवाणींनी मनावर घेतलं असतं तर सुरक्षा अधिकाऱ्यांचा निर्णय तात्काळ बदलला असता. पण त्यांनी सुरक्षा संबंधीच्या सल्ल्यांना पहिलं प्राधान्य दिलं. आणि सुरक्षा दलाने मंजूर केलेल्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही.

सचिन तेंडुलकरला वाटलं अणूबॉम्बचं बटन

या पुस्तकात काही हलकेफुलके प्रसंगही चित्तारण्यात आले आहेत. आजाद यांच्या मते, इस्लामाबाद विमानतळावर भारतीय टीम बसलेली होती. मी सचिन तेंडुलकरच्या बाजूला बसलो होतो. त्यावेळी सचिन तेंडुलकरने काळा सूट, काळी ब्रिफकेस हातात असलेल्या आणि उंच धिप्पाड सुरक्षा अधिकाऱ्याकडे बोट दाखवत एक निरागस प्रश्न विचारला. त्याच्याकडे असलेल्या सुटकेसमध्ये अणूबॉम्बचं बटन आहे का? असा सवाल सचिनने विचारला. त्यावर, आजाद यांनी हे जॅमर असल्याचं सचिनला सांगितलं. पण सचिनने मनाचं समाधान होईपर्यंत त्यांना अनेक प्रश्न विचारल्याचंही या पुस्तकात म्हटलं आहे. यावेळी सचिनसारक्या महान क्रिकेटरसोबत गप्पा मारण्याचा अनुभव अविस्मरणीय होता, असंही त्यांनी म्हटलं आहे. कारण क्रिकेटच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी जाणून घेण्याची सचिनकडे उत्सुकता होती, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात हा सामना मैत्री दौरा म्हणून गाजला. भारताने ही वनडे सीरिज 3-2 ने जिंकली होती. तर टेस्ट सीरिजवर 2-1 ने कब्जा केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us