T20 World Cup : भारताचा पाकिस्तानविरोधात पराभव, एमएस धोनीची 5 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली, VIDEO व्हायरल

| Updated on: Oct 25, 2021 | 11:50 AM

गेल्या तीन दशकांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ विश्वचषक स्पर्धेत 12 वेळा आमने-सामने आले होते आणि यातील प्रत्येक सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारत 12-0 ने आघाडीवर होता.

T20 World Cup : भारताचा पाकिस्तानविरोधात पराभव, एमएस धोनीची 5 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली, VIDEO व्हायरल
MS Dhoni
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. (T20 World Cup : MS Dhoni’s prediction of India’s defeat against Pakistan came true)

गेल्या तीन दशकांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ विश्वचषक स्पर्धेत 12 वेळा आमने-सामने आले होते आणि यातील प्रत्येक सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारत 12-0 ने आघाडीवर होता. मात्र रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात करत भारताचा विजयरथ रोखला. दरम्यान, भारताच्या पाकिस्तानविरोधात पराभवाची भविष्यवाणी एमएस धोनीने 5 वर्षांपूर्वी केली होती. धोनीचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाला होता धोनी?

2016 च्या टी-20 विश्वचषकातील सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. हा भारताचा पाकिस्तानवरील 11 वा विजय होता. या विजयानंतर धोनीने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली होती. त्यावेळी धोनीने भारताच्या पाकिस्तानसोबतच्या आगामी लढतींवर भाष्य केलं होतं, जे काल (रविवारी) खरं ठरलं. धोनीने त्यावेळी जे काही सांगितले ते 2021 मध्ये खरे ठरले. धोनी तेव्हा म्हणाला होता की, “अर्थातच आम्हाला या विक्रमाचा (11-0 ने आघाडीवर असल्याचा) अभिमान वाटला पाहिजे. विश्वचषकात आपण पाकिस्तानसोबत कधीही हरलो नाही, या गोष्टीचा अभिमान आहेच, परंतु नेहमीच असेच होईल असे नाही. आज नाहीतर उद्या, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी कदाचित 50 वर्षांनी, कधीतरी आपण नक्कीच हरणार आहोत.” त्याने म्हटल्याप्रमाणे पाच वर्षांनंतर भारत पाकिस्तानसोबत टी-20 विश्वचषकात पराभूत झाला आहे.

व्हिडीओ पाहा

भारताचा दारुण पराभव

अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.

भारताची अत्यंत सुमार फलंदाजी

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानचा दमदार विजय

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना

(T20 World Cup : MS Dhoni’s prediction of India’s defeat against Pakistan came true)