
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. टी 20i वर्ल्ड कप नंतर क्वचित संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली. त्यामुळे आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये फार काही बदल झालेला नाही. आयसीसीने बुधवारी 25 मार्च रोजी ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये क्वचित बदल झालाय. तर टीम इंडियाचा टी 20i वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप फायलननंतर एकही सामना खेळलेली नाही. मात्र त्यानंतरही सूर्याचा दबदबा पाहायला मिळाला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या या टी 20i क्रमवारीत टीम इंडियाच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये 4 भारतीय आहेत. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि तिलक वर्मा या तिघांनी आपलं स्थान कायम राखलं आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोठी झेप घेतली आहे.
टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि इशान किशन पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कायम आहेत. अभिषेकच्या खात्यात 875 रेटिंग आहेत. तर इशानच्या नावावर 871 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर तिलक वर्मा 742 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे.
या टी 20i बॅट्समन रॅकिंगमध्ये पहिल्या 6 स्थानात कोणताही बदल झालेला नाही. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यामुळे बदल झाल आहे. सूर्याला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. सूर्या नवव्या स्थानावरुन झेप घेऊन सातव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. मात्र सूर्याला कोणताही सामना न खेळता हा फायदा झाला आहे. त्यामुळे असं कसं झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आपण त्याबाबतही जाणून घेऊयात.
सूर्याला काहीही न करता फायदा होण्यामागे न्यूझीलंडचा फलंदाज टीम सायफर्ट कारणीभूत आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची टी 20i मालिका 3-2 ने जिंकली. टीम सायफर्ट या मालिकेचा भाग नव्हता. नियमानुसार, सामने असूनही खेळाडू सहभागी नसेल तर त्याचा परिणाम वैयक्तिक रेटिंग पॉइंट्सवर होतो. त्यामुळे टीमच्या खात्यात ताज्या आकडेवारीनुसार 719 रेटिंग पॉइंट्स आहेत. त्यामुळे सायफर्टच्या न खेळण्याचा सूर्याला फायदा झाला आहे.