
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. 2007, 2024 नंतर आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवत ट्रॉफीवर नाव कोरले. टीम इंडियाच्या या दमदार कामगिरीचे जगभर कौतुक होत आहे. या विजयानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना 131 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मात्र संघात एक असा व्यक्ती आहे ज्याच्या भविष्यावर येत्या काही दिवसांत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा व्यक्ती 2021 पासून टीमसोबत जोडलेला आहे. मात्र आता त्याची नोकरी जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारताने जरी वर्ल्डकप जिंकला असता तरी या स्पर्धेत संघाने सोडलेले कॅच आणि फील्डिंगमधील चुका चर्चेचा विषय ठरल्या. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक कॅच सोडले, त्यामुळे फील्डिंग कोच टी. दिलीप यांच्या भवितव्यावर बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते. याचे एक मोठे कारण म्हणजे दिलीप यांचा करार जून 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे दिलीप यांनी बीसीसीआय पुन्हा संधी देणार की नव्या कोचची नियुक्ती करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टी दिलीप 2021 पासून टीम इंडियासोबत जोडलेले आहेत. राहुल द्रविड हे कोच असताना त्यांनी काम सुरू केले होते. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर त्यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र मार्च 2025 पर्यंत त्यांचा करार वाढवण्यात आला. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांना मध्येच हटवण्यात आले होते. मात्र त्यावेळी रोहित शर्माने हेड कोच गौतम गंभीर आणि बीसीसीआयकडे टी दिलीप यांनी पुन्हा संधी देण्याची विनंती केली होती. रोहितच्या हस्तक्षेपामुळे त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती आणि ते इंग्लंड दौऱ्यापासून पुन्हा संघासोबत जोडले गेले हो. टी20 वर्ल्ड कपमध्येही ते फील्डिंग कोच म्हणून काम करत होते. मात्र आता ते संघाचा भाग राहतील की नाही, हे आता बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.
मागील वर्षी टी दिलीप यांनी पदावरून हटवले होते तेव्हा बीसीसीआयला चांगला पर्याय मिळाला नव्हता. त्यावेळी बीसीसीआय विदेशी फील्डिंग कोचच्या शोधात होती. मात्र योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे दिलीप यांना पुन्हा बोलावण्यात आले होते. टी. दिलीप यांना कोचिंगचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 2007 ते 2019 दरम्यान हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये कोच म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये कोचिंग केले आणि नंतर त्यांची टीम इंडियात नियुक्ती झाली होती. मात्र आता त्यांचा करार संपल्यास बीसीसीआय विदेशी फील्डिंग कोचची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.