IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफची रंगत वाढली आहे. अजूनही कोणत्याच संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. तसं पाहिलं तर पंजाब किंग्स, आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सहज स्थान मिळवतील असं वाटतं. पण राजस्थानचं गणित किचकट होताना दिसत आहे.

IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 02, 2026 | 3:36 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 43 सामन्यांचा खेळ संपला आहे. मात्र अजूनही प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाला जागा मिळवता आलेली नाही. त्यामुळे ही रंगत आणखी वाढत जाणार यात शंका नाही. स्पर्धेत प्रत्येक संघ हा 14 सामने खेळणार आहे. त्यात राजस्थान रॉयल्स हा एकमेव संघ असा आहे की, त्यांनी 10 सामने खेळले आहे. तर इतर संघांनी 8 किंवा 9 सामने खेळलेले आहेत. राजस्थान रॉयल्सने 10 सामने खेळले असून त्यात 6 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात 12 गुण असून नेट रनरेट हा +0.510 इतका आहे. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्स चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. शेवटच्या टप्प्यात पराभव होत असल्याने संधी हुकण्याची भीती सतावत आहे. कारण आता उर्वरित चार सामन्यात काही उलथापालथ झाली तर प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट होऊ शकतो.

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आता फक्त चार सामने खेळायच आहेत. प्लेऑफचं गणित सोडवायचं तर चार पैकी 2 सामने जिंकणं भाग आहे. कारण दोन सामने जिंकले तर 16 गुणांचं गणित सुटेल. अन्यथा सर्व गणित जर तर वर येईल. राजस्थान रॉयल्सचे पुढचे चार सामने हे गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहेत. हे चारही टॉप 4 मध्ये नाहीत. त्यामुळे या चारही सामना टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला पुढच्या दोन सामन्यात विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण या चारही संघांना पुढचं गणित सोडवायचं आहे.

दिल्लीकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, मला वाटतं ही एक चांगली धावसंख्या होती. मला वाटलं की इथे २०० धावा ही एक सरासरी धावसंख्या होती. खेळपट्टी थोडी मंदावणार होती, पण मला वाटतं की मधल्या षटकांमध्ये आम्ही खूपच चांगली गोलंदाजी करू शकलो असतो, त्यांना जास्त मोकळीक द्यायला नको होती. आणि मग एकाच षटकात खूप चौकार झाले आणि त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे मला वाटलं की आम्ही ती संधी गमावली, पण आम्ही घेतलेल्या निर्णयात काही नुकसान नाही.

Follow Us