IND A vs AFG A: भारत अ संघाने पराभवाचा वचपा काढला, अफगाणिस्तानला लोळवत अंतिम फेरी गाठली
India A vs Afghanistan A: भारत अ आणि अफगाणिस्तान अ संघ ट्राय सिरिज मालिकेत दुसऱ्यांदा भिडले. पहिल्यात सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव सहन करावा लागला होता. त्याचा वचपा दुसऱ्या सामन्यात भारताने काढला आणि अंतिम फेरी गाठली आहे.

India A vs Afghanistan A: श्रीलंकेत ट्राय नेशन वनडे सीरिज खेळली जात आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात अफगाणिस्तान अ आणि भारत अ संघ भिडले. या स्पर्धेत हे दोन संघ दुसऱ्यांदा भिडले. भारताने या सामन्यात या नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी वाटेला आली. भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 319 धावा केल्या. तसेच विजयासाठी 320 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 218 धावांवर बाद झाला. भारताने हा सामना 101 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने चार गुणांची कमाई केली तसेच मोठा विजय मिळवल्याने नेट रनरेटही चांगला आहे. त्यामुळे गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. अफगाणिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर नेट रनरेट सुधारणं खूपच कठीण होणार आहे. त्यामुळे भारताचं अंतिम सामन्यात स्थान जवळपास पक्कं झालं आहे. भारताकड़ून प्रियांश आर्यने 58, तिलक वर्माने 59, कुमार कुशाग्रने 58 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत निशांत सिंधुने 6.5 षटकात 31 धावा देत 4 गडा बाद केले. त्याला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
भारताचा कर्णधार तिलक वर्माने या विजयानंतर सांगितलं की, ‘हो, पण खरं सांगायचं तर, आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. पण तुम्ही पाहू शकता की खेळपट्टीमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे मला वाटतं की आज प्रत्येक गोलंदाजाने ती जबाबदारी घेतली आणि चांगली गोलंदाजी केली. खरं सांगायचं तर, त्यांचे वेगवान गोलंदाज ज्याप्रकारे योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत होते, ते जोरदार फटकेबाजी करत होते आणि ते पाहून छान वाटत होतं. पण त्याच वेळी, मला माझ्या मूलभूत गोष्टींचे पालन करायचे होते आणि त्या क्षणी आम्हाला एका चांगल्या भागीदारीची गरज होती. त्यामुळे मी त्याच गोष्टीकडे लक्ष देत होतो.’
या मालिकेतून काही शिकायला मिळालं का? यावर तिलक वर्मा म्हणाला की, ‘नक्कीच, खूप काही शिकायला मिळालं आहे. त्याच वेळी, तुम्ही आमच्या संघातील अनेकांना पाहिलं असेल, ते पहिल्यांदाच खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी हा एक मोठा शिकण्याचा अनुभव आहे. प्रत्येकजण येत आहे आणि चांगल्या प्रकारे शिकत आहे. तुम्ही पाहू शकता, मागील दोन सामन्यांच्या तुलनेत, ते आज कसे खेळले. त्यामुळे हो, हा प्रत्येकासाठी एक मोठा शिकण्याचा अनुभव आहे.’