
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 6 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी निवडली. भारताला वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर सलामीला आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी उतरली. या जोडीने टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला चांगली सुरुवात मिळाली. पण मोठी खेळी करण्यात त्याला सपशेल अपयश आलं. त्याने 22 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. खरं तर वैभवचा डाव आधीच आटोपला असता. कारण पाकिस्तान क्रिकेटचं दर्शन या सामन्यात घडलं. पाकिस्तान आणि क्षेत्ररक्षण म्हंटलं की कधी काय होईल सांगता येत नाही. त्याची प्रचिती या सामन्यात आली. वैभव सूर्यवंशीचा सोपा झेल सोडला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण आणखी एक संधी गचाळ क्षेत्ररक्षणामुळे गमावली.
पाकिस्तानकडून संघाचं आठवं षटक टाकण्यासाठी मोहम्मद सय्यम आला होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वैभव सूर्यवंशीने जोरदार प्रहार केला. पण चेंडू वर चढला आणि मोहम्मद सय्यमला झेल पकडण्यासाठी सरसावला. खरं तर हा झेल हातात होता. पण हातून झेल सुटला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी खेळपट्टीच्या मधोमध धावत आला होता. त्यामुळे विकेटकीपरच्या दिशेने त्याने फेकला. पण येथे विकेटकीपरचं गचाळ क्षेत्ररक्षण भोवलं आणि वैभव सूर्यवंशीला जीवदान मिळालं. पण त्याच्या फायदा काही त्याला उचलता आला नाही. पुढच्या चेंडूवर वैभव बाद होत तंबूत परतला. हमजा झहूरने त्याचा झेल सोडण्याची चूक केली नाही.
दरम्यान, आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावगतीला ब्रेक लागला. भारतीय संघाने कशी बशी 200 धावांच्या पार मजल मारली. यात वेदांत त्रिवेदीची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 98 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 68 धावा केल्या. तर तळाशी आलेल्या आरएस अंब्रिशने डाव सावरण्यास मदत केली.
उपांत्य फेरी गाठण्याची दोन्ही संघांना संधी आहे. पण पाकिस्तानसाठी हे गणित थोडं किचकट आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि 250 धावा केल्या तर पाकिस्तानला 25 किंवा कमी षटकात हे आव्हान गाठावं लागणार आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांना धुरा सांभाळावी लागणार आहे.