टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी वेस्ट इंडिज, अमेरिकेला शेवटची संधी, कसं काय झालं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. गट 2 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेने पुढच्या प्रवासासाठी कूच केली आहे. तर अमेरिका आणि वेस्ट इंडिजचं गणित मात्र बिघडलं आहे. चला जाणून घेऊयात उपांत्य फेरीची कोणाला किती संधी ते..

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी वेस्ट इंडिज, अमेरिकेला शेवटची संधी, कसं काय झालं ते जाणून घ्या
| Updated on: Jun 20, 2024 | 4:55 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार सुरु झाला आहे. दुबळे समजले जाणारे संघही आपली ताकद दाखवत आहे. अमेरिका आणि दक्षिण अफ्रिका संघात झालेल्या सामन्याने याची अनुभूती दिली. दक्षिण अफ्रिकेने अमेरिकेसमोर विजयासाठी 194 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण अमेरिकन संघ 6 गडी गडी गमवून 176 धावा करू शकला. अमेरिकेने विजयासाठी चांगलीच झुंज दिली. पण 18 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तसंच काहीसं वेस्ट इंडिजच्या बाबतीत झालं. वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 17.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीसाठी करो या मरोची लढाई आहे. सुपर 8 फेरीत दोन सामने जिंकण्याशिवाय नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरतो. अशा या दोन संघांची कसोटी लागणार आहे. अमेरिकेचा पुढचे सामने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. तर वेस्ट इंडिजचा पुढचा सामना दक्षिण अफ्रिका आणि अमेरिकेविरुद्ध आहे. तसं पाहिलं तर चारही संघांचे पाय एकमेकात अडकले आहेत. पण इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेकडे संधी आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका हा सामना 21 जूनला होणार आहे. या दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे यापैकी जो संघ जिंकेल त्याला उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित होईल. तर पराभूत होणाऱ्या संघाला पुढचा मार्ग बिकट होऊ शकते. दुसरीकडे, अमेरिका विरुद्ध् वेस्ट इंडिज 22 जूनला होणार आहे. या दोन्ही संघांसाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. या सामन्यात विजयी संघाचं गणित पुढच्या सामन्यावर आधारित राहिल. जर अमेरिका जिंकली तर त्यांचा पुढचा सामना इंग्लंडशी 23 जूनला होईल. तसेच वेस्ट इंडिज जिंकली तर पुढचा दक्षिण अफ्रिका 24 जूनला होणार आहे.

सुपर 8 फेरीतून कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतात याची उत्सुकता लागून आहे. दुसऱ्या गटात भारत अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पुढची वाट सोपी करायची असल्यास विजय खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण अफगाणिस्तानचा गोलंदाजीचा मारा पाहून काहीही होऊ शकतं. आतापर्यंत दोन्ही संघ 8 वेळा भिडले आहेत. यात सातवेळा भारताने विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.